बिश्केक,
belarusian riots जागतिक राजकारणात एका नव्या शक्ती समीकरणाची चर्चा रंगली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी केलेल्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला आणि संरक्षणाला दिशा देण्याची ताकद आता केवळ तीनच देशांकडे असल्याचे विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण परिषदेत लुकाशेन्को यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या बदलत्या काळात जगाची खरी सूत्रे भारत, रशिया आणि चीन या तीन प्रमुख देशांच्या हाती आहेत. हे तिन्ही देश केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत नसून, बलाढ्य अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणूनही जगाचे नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे, पारंपारिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचा नामोल्लेख टाळून त्यांनी आशियाई आणि युरेशियन राष्ट्रांच्या वाढत्या प्रभावावर शिक्कामोर्तब केले. परिषदेच्या शेवटी सर्व सदस्य देशांनी एकत्र येत 'बिश्केक घोषणापत्र' जारी केले. या अंतर्गत खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. या परिषदेत भारताच्या पुढाकाराने प्रादेशिक स्थिरता, दहशतवादविरोधी धोरण आणि परस्पर सहकार्याला नवे बळ मिळाले असून, रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, इराण, बेलारूस आणि मध्य आशियातील इतर देशांच्या उपस्थितीमुळे SCO ची ताकद अधिक स्पष्ट झाली आहे.
दहशतवादाविरोधात इशारा
दहशतवादाचा सरकारी धोरण म्हणून वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आवाहन भारतीय पंतप्रधानांनी केले. दहशतवादाविरोधातील लढ्यात कोणताही दुटप्पीपणा सह्य केला जाणार नाही, यावर परिषदेत एकमत झाले.
सायबर सुरक्षेवर भर
फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवायांसाठी इंटरनेटचा वाढता वापर रोखण्यासाठी सर्व सदस्य देश संयुक्तपणे काम करतील. डिजिटल सुरक्षा आणि नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचा समन्वय वाढवला जाईल.
सार्वत्रिक सुरक्षा केंद्र
आंतरराष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने निश्चित केलेल्या १३ महत्त्वाच्या निर्णयांपैकी एका
सार्वत्रिक सुरक्षा केंद्राच्या नियमांना मंजुरी देण्यात आली.
पश्चिम आशियातील तणाव
इराणवरील लष्करी कारवायांवर सदस्य राष्ट्रांनी तीव्र चिंता व्यक्त करत, प्रादेशिक शांततेसाठी संवादाची गरज अधोरेखित केली.