मुंबई
maharashtra waqf board उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा नियुक्ती धोरण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे स्वायत्त मंडळ असल्याने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पात्र वारसांना सेवेत असताना मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचे विद्यमान धोरण या मंडळाला लागू होत नव्हते. मात्र, आता राज्य सरकारने हे धोरण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळालाही लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील शासनादेशही जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत असताना कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा धोरणानुसार मंडळात नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित वारसाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गट क किंवा गट ड पदावर ही नियुक्ती दिली जाऊ शकणार आहे.
अनुकंपा नियुक्तीसाठी पात्रता तारीख २१ सप्टेंबर २०१७ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या तारखेला किंवा त्यानंतर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या पात्र वारसांना या धोरणानुसार मंडळात नियुक्ती मिळू शकेल.दरम्यान, ३१ डिसेंबर २००१ नंतर संबंधित कर्मचाऱ्याला तिसरे अपत्य झाले असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू होणार नाही, अशी तरतूदही करण्यात आली आहे. या निर्णयासंदर्भातील शासन आदेश शासकीय संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पात्र वारसांना आता अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.