नवी दिल्ली,
Abhinandan has left the Air Force २०१९च्या भारत-पाकिस्तान हवाई संघर्षात पाकिस्तानी एफ-१६ विमान पाडून चर्चेत आलेले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी हवाई दलाची सेवा सोडल्याचे वृत्त आहे. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आता गोवास्थित ‘फ्लाय९१’ या प्रादेशिक एअरलाइनमध्ये पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारली असून ऑगस्ट महिन्यात त्यांनी काम सुरू केले.‘फ्लाय९१’च्या प्रवक्त्याने अभिनंदन वर्धमान यांच्याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला असून कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती गोपनीय असल्याचे सांगितले. ही एअरलाइन मार्च २०२४ मध्ये सुरू झाली असून सध्या तिच्या ताफ्यात सहा विमाने आहेत. गोवा आणि हैदराबाद ही एअरलाइनची दोन कार्यान्वयन केंद्रे आहेत.

२६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हवाई कारवाई केली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारीला झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन यांनी मिग-२१मधून पाकिस्तानी एफ-१६ पाडले; मात्र त्यांचे विमानही कोसळले आणि त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. भारत सरकारच्या दबावानंतर तीन दिवसांनी त्यांची सुटका झाली. या शौर्यासाठी २०२१ मध्ये त्यांना युद्धकाळातील देशाचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘वीर चक्र’ प्रदान करण्यात आला.