सहनशीलतेच्या चौकटी मोडून सहा स्त्रियांची बंडखोरी; ‘बंडखोर’चं नवं पोस्टर चर्चेत

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
मुंबई
bandkhor सहन करणं, गप्प राहणं आणि परिस्थितीशी जुळवून घेणं, या स्त्रीच्या वाट्याला आलेल्या पारंपरिक चौकटी आता मोडून काढण्याची वेळ आली आहे. याच विचारावर भाष्य करणाऱ्या ‘बंडखोर’ या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, या पोस्टरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे. स्वतःसाठी ठामपणे उभं राहणं, प्रश्न विचारणं आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवणाऱ्या सहा स्त्रियांची झलक पोस्टरमध्ये पाहायला मिळते.
 

bandkhor new poster six fearless women unite against injustice in mahesh manjrekar’s upcoming marathi film 
पोस्टरमध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या सहा अभिनेत्री वेगळ्याच रुबाबात दिसत आहेत. त्यांच्या देहबोलीतून आत्मविश्वास आणि बेधडकपणा स्पष्टपणे जाणवतो. मात्र, या सहा जणींची बंडखोरी नेमकी कशाविरोधात आहे, त्यांचा हा निर्भीडपणा कुठून आला आणि त्यांच्या या वृत्तीमुळे कथेत कोणते वळण येणार, याबाबतचं कुतूहल पोस्टरमुळे अधिक वाढलं आहे.
‘बंडखोर’ हे केवळ चित्रपटाचं नाव नसून या सहा पात्रांच्या स्वभावाची ओळख असल्याचं पोस्टरवरून जाणवतं. अन्यायाविरोधात आवाज उठवणं, मनाविरुद्ध असलेल्या गोष्टींना ठामपणे नकार देणं आणि आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं, ही या सहा स्त्रियांची भूमिका आहे. त्यामुळे बंडखोरी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीच एक महत्त्वाची बाजू असल्याचं चित्रपटातून अधोरेखित होतं. या सहा पात्रांचे वेगळे स्वभाव आणि त्यांचा बेधडक दृष्टिकोन दाखवणारं पोस्टर त्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सहा पात्रांविषयी सांगितलं, “‘बंडखोर’मधल्या या सहा जणी केवळ पडद्यावरची पात्रं नाहीत, तर आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या स्वभावातच एक स्पष्टपणा आहे. चुकीचं वाटत असेल तर त्या त्याला विरोध करतात आणि स्वतःच्या आयुष्याबाबतचे निर्णय घेताना कुणाच्या परवानगीची वाट पाहात नाहीत. त्यांची ही बेधडक वृत्ती, त्यांचे वेगळे स्वभाव आणि आयुष्याकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन या सगळ्यामुळे ‘बंडखोर’ची गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे.”
संजय शेटये आणि विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित, तर सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवादलेखन इरावती कर्णिक यांनी केलं आहे. सहा ‘बंडखोर’ स्त्रियांची ही कथा येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.