मुंबई
bharti singh ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया ही जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघांची विनोदी शैली, एकमेकांची टेर खेचण्याची पद्धत आणि त्यांची मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांना कायमच भावते. आता त्यांच्या ‘इंडियन गेम शो विथ भारती अँड हर्ष’चा नवा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रोमोमध्ये हर्षने भारतीच्या वजनावर केलेल्या मस्करीमुळे दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळते.
प्रोमोमध्ये हर्ष स्पर्धकांना भारतीचे वजन किती असेल, असा अंदाज विचारताना दिसतो. यावेळी काही स्पर्धकांनी भारतीचे वजन 86, 88, तर काहींनी 91 किलो असल्याचे सांगितले. त्यावर प्रिन्स भारतीला म्हणतो की, 91 किलो वजन सांगणाऱ्या व्यक्तीला तू एका मुक्क्यात खाली पाडू शकतेस. यानंतर भारती आपल्या नेहमीच्या मिश्कील अंदाजात ‘सुंदर मुलींमध्ये अक्कल कमी असते’, अशी विनोदी टिप्पणी करते.
मात्र, त्यानंतर या प्रसंगाला आणखी रंगत येते. भारती थेट हर्षलाच तिचे वजन किती आहे, असा प्रश्न विचारते. हर्ष काहीसा अंदाज घेत तिचे वजन 67 ते 70 किलोच्या आसपास असल्याचे सांगतो. हे उत्तर ऐकताच भारती त्याच्यावर नाराज झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे, आदल्याच दिवशी तिचे वजन तपासण्यात आले होते. तरीदेखील आपल्या पत्नीचे वजन हर्षला माहीत नसल्याने भारती त्याची चांगलीच फिरकी घेताना दिसते.
भारती पुढे तिच्या खास विनोदी शैलीत हर्षची टर उडवते. हर्षचा उद्देश फक्त मुलं होऊ द्यायचा होता; घरातील सर्व कामे, स्वयंपाक आणि मुलांची जबाबदारी तिचीच आहे, मात्र तिचे वजन किती आहे याकडे त्याचे लक्ष नसल्याची मिश्कील तक्रार ती करते.
भारतीची ही टिप्पणी ऐकल्यानंतर bharti singh हर्षही गप्प बसत नाही. तो तिला वजनाच्या मशीनवर उभे राहण्यावरून चिडवत आणखी विनोद करतो. त्यावर भारतीदेखील आपल्या खास शैलीत हर्षला भन्नाट प्रत्युत्तर देते. त्यामुळे प्रोमोमध्ये दिसणारा हा प्रसंग प्रत्यक्षातील गंभीर भांडण नसून भारती आणि हर्ष यांच्या नेहमीच्या विनोदी केमिस्ट्रीचाच एक भाग असल्याचे स्पष्ट होते.दरम्यान, ‘इंडियन गेम शो विथ भारती अँड हर्ष’चा प्रीमियर 24 ऑगस्ट 2026 रोजी झाला आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी सहभागी होत असून त्यांना मजेदार गेम्स, फिजिकल टास्क आणि स्किल-बेस्ड खेळांचा सामना करावा लागत आहे. भारती आणि हर्षची धमाल केमिस्ट्री तसेच सेलिब्रिटींचा खेळकर अंदाज यामुळे हा शो सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.