प्रारुप यादीत नावं तपासून आक्षेप, हरकती दाखल करा: आयुक्त बिदरी

एसआयआरचा घेतला आढावा

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
वर्धा,
commissioner bidari मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकही पात्र मतदार यादीतून वगळू नये यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीत मतदारांनी आपली नावे तपासावी. त्यात काही दुरुस्ती, बदल, समावेश असल्यास तसे आक्षेप, हरकती मुदतीत सादर करावे. राजकीय पक्षांनी देखील यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.
 
 
commissioner bidari
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ४ सष्टेंबर रोजी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावीत, आदी उपस्थित होते.
 
मतदार यादी अधिकाधिक शुद्ध, अद्ययावत करण्याचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी केलेल्या पडताळणी प्रमाणे मतदार यादीचे प्रारुप तयार करून प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी कार्यालये तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करावे. नावात, मतदान केंद्रात किंवा अन्य बदल असतील किंवा नव्याने नाव समाविष्ठ करावयाचे असल्यास आवश्यक नमुन्यातील अर्ज भरून दावे सादर करावे, असे बिदरी म्हणाल्या.
 
 
मतदार नोंदणी अधिकार्यांनी यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. विशेषत: महिला, दिव्यांग, पारधी बेडा, बंजारा तांडा, भटक्या समाजातील नागरिकांचे वास्तव्य असलेली ठिकाणे अशा ठिकाणी प्राधान्याने शिबिरे घेण्यात यावी. कुटुंबातील सर्वच व्यक्तींची नावे एका मतदान केंद्रावर राहतील, असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रारुप यादी प्रसिध्द झाल्यानंतर दाखल होणारे दावे, हरकतींवर गतीने आणि स्थानिक स्तरावरच सुनावणी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
 
सुरुवातीस जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी प्रारूप मतदार यादीची माहिती दिली. या यादीत ९ लाख ५९ हजार ६४ मतदारांचा समावेश आहे. १ लाख ७८ हजार १७८ मतदारांचे अर्ज विविध कारणाने जमा होऊ शकले नाही. नव्या रचनेप्रमाणे जिल्ह्यात १ हजार ३१३ मतदान केंद्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.