असे अधिकारी देशभर हवेत

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
दृष्टिकोन

International recognition of Tukaram Mundhe गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली महाराष्ट्रातले कार्यक्षम आणि स्पष्टवक्ते सरकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नोंद एव्हाना आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनीही घेतली आहे. असे अधिकारी, त्यांची कार्यशैली हा किरकोळ चर्चेचा विषय नाही, तर देशभरात या प्रामाणिक कारभाराचा कित्ता गिरवण्याची गरज आहे. एखाद्या अधिकाऱ्याने सत्याची आणि नियमांची वाट चोखाळायचे ठरवले तर काय घडू शकते, हे यामधून स्पष्ट होते. इतकेच नव्हे, तर कोणत्याही समस्येकडे किंवा सरकारी कामातील त्रुटीकडे अवघ्या देशातील सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारे बघायला हवे, याचा वस्तुपाठही येथे मिळतो. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यातील जनतेची मने अल्पावधीतच जिंकली आहेत. नियम आणि कायद्यांची काटेकोर व कठोरपणे अंमलबजावणी करणारा नोकरशहा अशी त्यांची ख्याती आहे. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा अधिकारी म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देणारा आणि नियम व कायदे याविषयी जनजागृती करणारा हा अधिकारी आहे. म्हणूनच ‘एफडीएचे सिंघम’ म्हणून त्यांनी जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे.

 
 
mude
 
 
राज्यात नोंदणीकृत हॉटेल्सची संख्या अकरा लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईत हॉटेल्सची संख्या चार लाखांहून अधिक आहे. अनधिकृत-नोंदणी न केलेल्या खाणावळी, हॉटेल्स, रस्त्यावर-पदपथावर-रेल्वे स्टेशनसमोर किंवा एसटी बस स्थानकासमोर आणि कार्यालयांनी गजबलेल्या ठिकाणी खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्या टपऱ्या, स्टॉल्स, उभारलेले तंबू यांची संख्यासुद्धा लाखोंमध्ये असावी. रोज लाखो-कोटी लोक तेथे चहा, नाश्ता, जेवण करतात. पण तेथील किचन कसे आहे हे कुणालाच ठावूक नसते. कोण काय बनवतं हे माहिती नसते. मेन्यूतील पदार्थ बनवताना त्यात कोणते तेल, तूप, मसाले वापरले जातात हे ठावूक नसते. किचनमधील स्वच्छता, नेटकेपणा काय आहे याची कुणाला जाणीव नसते. कपडे खरेदी करताना, अगदी शर्ट-पँट खरेदीच्या वेळी निरखून पारख केली जाते, दुकानातील विक्रेत्याला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते, किमतीबाबत घासाघीसही केली जाते, पण आपण भूक लागली म्हणून पोटपूजा करण्यासाठी जातो तिथे पदार्थांची ऑर्डर दिल्यानंतर टेबलवर आणून देतील ते निमूटपणे खातो आणि जीएसटीसकट बिल देऊन बाहेर पडतो. पण आपण चवीने खाल्लेले पदार्थ बनवणाऱ्या स्वयंपाकघरातील वातावरण कसे आहे, याची आपल्याला उत्सुकताही नसते. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून हॉटेल्सची स्वयंपाकघरे तपासण्याची मोहीम सुरू केली. त्यांच्या टीमने मुंबईत घातलेल्या धाडींना मोठी प्रसिद्धी मिळत असली तरी अशी तपासणी मोहीम राज्यात सर्व शहरात चालू आहे.
 
 
 

पान टपरीपासून मोठ मोठी नामांकित हॉटेल्स, त्रितारांकित व पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटस, मॉल्स, नावाजलेले क्लब्ज, आईस्क्रीम पार्लर अशा अनेक ठिकाणी एफडीआयच्या टीम्सनी रोज किचन तपासणीचा धडाका लावला. नामांकित मिठाईची दुकाने, डेअरी फार्मची सुद्धा त्यातून सुटका नाही. मंत्रालय आणि विधान भवनाच्या उपाहारगृहाचीही एफडीएने तपासणी केली. अनेक सेलिब्रेटींच्या नावाने हॉटेल्स उभी आहेत. त्यांनाही अशा तपासणीला सामोरे जावे लागले. अशा धाडीनंतर किचनमधील स्वच्छता, शुद्ध पदार्थांचा वापर, शिस्त याचे पालन करण्यासाठी हॉटेलमालकांची धावधाव झाल्याचे बघायला मिळाले. कायद्याचे हात किती लांब असतात, हे तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे आयुक्त म्हणून महाराष्ट्राला दाखवून दिले. एकावन्न वर्षे वयाचे तुकाराम मुंढे हे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. ते स्वत:विषयी खूप कमी बोलतात. मुंबई प्रेस क्लबने त्यांना नुकतेच वार्तालाप कार्यक्रमासाठी बोलावले होते. त्या कार्यक्रमाला सव्वाशे ते दीडशे पत्रकार, टीव्ही वार्ताहर, कॅमेरामन, फोटोग्राफर्स यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला त्यांच्याशी बोलायचे होते, त्यांना प्रश्न विचारायचे होते. एका ज्येष्ठ पत्रकाराने तर त्यांची तुलना अमिताम बच्चन यांच्याशी केली. अनेकांनी त्यांचा उल्लेख ‘सिंघम’ म्हणून केला. तुकाराम मुंढे यांची लोकप्रियता आज मोठ्या उंचीवर आहे. पण त्याबरोबर जनतेला त्यांच्याविषयी मोठा आदर आणि आपुलकी वाटत आहे. हे भाग्य फारच थोड्या नोकरशहांना मिळाले असावे. म्हणूनच अशा एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कार्याचा आणि कार्यशैलीचा कित्ता देशभरातील अधिकाऱ्यांनी गिरवावा, असे वाटते.

 
 
 
तुकाराम मुंढे हे होणाऱ्या कौतुकाने भारावून जात नाहीत आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीकेने खचून जात नाहीत. ते नेहमी संयमी आणि शांत असतात. दुसऱ्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतात. एखाद्यावर चुकीने कारवाई झाली असेल तर त्याला पुन्हा संधी देतात. मुद्दाम कोणी चूक केली नसेल तर त्यालाही पुन्हा संधी देतात. ते म्हणतात, मी वेगळे काहीच करत नाही. मी फक्त नियम आणि कायदे यांची काटेकोर अंमलबजावणी करत असतो. मी कोणी सेलिब्रेटी नाही किंवा इतरांपेक्षा वेगळा नाही. गेल्या एकवीस वर्षांमध्ये पंचवीस वेळा त्यांची बदली झाली, उद्या एफडीएमधून बदली झाली तर..., असा प्रश्न विचारला तेव्हा ते नम्रपणे म्हणाले, माझ्या बदलीबाबतचा प्रश्न आपण संबंधित ॲथॉरिटीला विचारा. मी दुसरीकडे गेलो तरी कामाची शैली अशीच पुढे चालू राहते. आज सरकारी दबावाखाली किंवा ठरावीक राजकारण्यांच्या दबावाखाली काम करणारे अधिकारी अनेक राज्यांमध्ये पैशापासरी सापडतील. म्हणूनच नियमांच्या चौकटीत सक्षमतेने काम करणाऱ्या अशा अधिकाऱ्याचे उदाहरण अवघ्या देशाने समोर ठेवायला हरकत नाही. तुकाराम मुंढे ज्या पदावर असतात, तिथे धडाकेबाज काम करतात, बेशिस्त व बेकायदेशीरपणा अजिबात खपवून घेत नाहीत. त्यामुळे हितसंबंधी लोक नाराज होतात. वर्षानुवर्षे सेटिंग लावून अधिकाऱ्यांना मॅनेज करून कामे करून घेण्याची सवय लागलेले अनेक जण अस्वस्थ होतात. म्हणून अशा दलालांना, मध्यस्थांना मुंढेंसारखे अधिकारी नकोसे वाटतात. हे चित्र अवघ्या देशामध्ये सार्वत्रिक मानता येते.
 
 

राजकारणी आणि राज्यकर्त्यांनाही तुकाराम मुंढे आपल्या खात्यात येणे अडचणींचे वाटते. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, नाक्यानाक्यावर झळकणारी बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनर्सविरोधात मोहीम सुरू केली. राजकारण्यांसाठी ती अडचणीची ठरली. महापालिकेत सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव करून त्यांच्या बदलीची मागणी केली. मुंढे यांची बदली झाली, पण त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही. एव्हाना देशाचे वैभव असलेला गणेशोत्सव समोर आहे. गणेशोत्सवात विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप होते. महाप्रसादासाठी परवाना आवश्यक असल्याचे आदेश एफडीएने जारी केले आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी परवाना आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे. राज्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान, असा प्रचार करून रक्त जमवले जाते. ते कोणत्या रक्तपेढीला पुरवले जाते, त्यापोटी पैसे दिले जातात का, त्याचा वापर पुढे कसा होतो, हे ठावूक नसते. म्हणून रक्तदान शिबिरासाठी परवाना आवश्यक आहे, असा फतवा एफडीएने काढला आहे. मेडिकलच्या दुकानातील औषधांची आणि पॅकिंगची तपासणीही चालू आहेच. अशी ही तपासणी आणि त्याबाबतची जागरूकता एका राज्यापुरती का मर्यादित रहावी? त्यासाठी जबाबदारी निभावण्याचा हा पॅटर्न देशभर अंगीकारला जायला हवा.

 
 
पद कोणतेही असो, नियमांशी तडजोड नाही, हे तुकाराम मुंढे यांच्या कामाचे सूत्र आहे. भेसळयुक्त अन्न, निकृष्ट किंवा बनावट औषधे, प्रतिबंधित पदार्थ, चुकीचे लेबलिंग, अस्वच्छ अन्ननिर्मिती याचा परिणाम लाखो लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, याचे भान ठेवून एफडीए काम करत आहे. फाईलींच्या निपटाऱ्यामध्ये अडकून पडण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत. त्यातूनच तुकाराम मुंढे यांच्या कामाचा दरारा आणि विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. अशी तत्परता, शिस्त आणि पारदर्शकता, पोलिस-प्रशासन व सरकारी कामात दिसावी आणि असे चित्र देशभर पाहायला मिळावे, ही अपेक्षा आहे.
 
 
डॉ. सुकृत खांडेकर