पुणे
mpsc paper leak MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, पुण्यात पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. MPSCच्या परीक्षा पुन्हा पेपरफुटीच्या घटनांपासून मुक्त व्हाव्यात आणि त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी केली.
या विद्यार्थी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सहभाग घेतला. त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारकडे विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधण्याची मागणी केली.
“मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं आहे. विद्यार्थी चर्चेला तयार आहेत. परंतु कोण येत आहे त्यांच्याशी चर्चा करायला? दुर्दैवी आहे की, मुलांनी शिक्षण, नोकरी केली पाहिजे, चांगलं शिक्षण घेऊन देशाची सेवा केली पाहिजे. परंतु दुर्दैवाने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे. हे सरकारचं अपयश आहे. मी विनम्रपणे सांगत आहे की, एका जबाबदार व्यक्तीला पाठवा आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करा,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर का केला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “तंत्रज्ञानाचा उपयोग का होत नाही, माहीत नाही. अशा अनेक परीक्षा जगभर होतात. भारतातही अनेक परीक्षा आहेत. तिथे पेपर फुटले नाहीत. मग याच परीक्षेत कसे पेपर फुटतात? एवढं एआय आणि तंत्रज्ञान आहे. त्यामुळे काही तरी करू शकतात. पेपर फुटणं थांबू शकत नाही, यावर माझा विश्वास नाही,” असं त्या म्हणाल्या.
देशात विविध स्वायत्त संस्था कार्यरत असल्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जबाबदार व्यक्ती पाठवण्याचं आवाहन केलं. “देशात स्वायत्त संस्था किती आहेत, हे मी सांगायला नको. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाठवा. मुलांसोबत चर्चा करा. सगळे मिळून मार्ग काढू. सर्व आपली मुलं आहेत. त्यांच्यासाठी मार्ग काढू,” असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राज्यातील इतर प्रश्नांवरूनही सरकारवर टीका केली. “सरकार कुणासाठी आहे? सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी आहे. तुमच्या चॅनलचे तास कमी पडतील, तितकी आंदोलनं राज्यात होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या, हे देखील तुमच्या चॅनलवर पाहिलं. शेतकरी, महिला, युवक सर्व रस्त्यावर आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या mpsc paper leak MPSC समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. मोर्चाला झालेली गर्दी पाहता विद्यार्थ्यांच्या मनातील आक्रोश स्पष्टपणे दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच, MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी वेळोवेळी करत आहेत; या मागणीवरही सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.दरम्यान, पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष या आक्रोश मोर्चातून पुन्हा एकदा समोर आला आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आणि भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.