इस्लामाबाद,
pakistan-imf-pressureपाकिस्तानमध्ये गुलामीचा अंत झालेला नसून केवळ तिचे स्वरूप बदलले आहे, असा खळबळजनक दावा जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फझल या पक्षाचे प्रमुख मौलाना फझलुर रहमान यांनी केला आहे. देशाची आर्थिक धोरणे आणि संसाधनांवर आता जागतिक संस्थांचा ताबा असून, पाकिस्तान आपले सार्वभौमत्व गहान ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
रहमान एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) , वर्ल्ड बँक आणि इतर कर्जदात्या देशांच्या दबावाखाली काम करत आहे. या आर्थिक मजबुरीमुळे देशाला आपले धोरणात्मक निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नाहीत. पाकिस्तानला स्वतःच्या आर्थिक निर्णयांवर आणि नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चीन सध्या पाकिस्तानच्या कारभारावर नाराज असून, तो बलुचिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमधून हळूहळू माघार घेत आहे.
बलुचिस्तानच्या चागाई जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘रेको डिक’ प्रकल्पात नेमके कोण उत्खनन करत आहे आणि त्याचा खरा फायदा कोणाला मिळत आहे ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अनेक दशकांपासून सुरू असलेला ‘सैंदक’ प्रकल्प अपेक्षित यश मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.