नवी दिल्ली
satya niketan building collapse दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात इमारत कोसळून किमान सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्ली महानगरपालिकेने (MCD) मोठी कारवाई केली आहे. दक्षिण विभागातील पाच अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार हे निलंबन शिस्तभंगाच्या चौकशीदरम्यान लागू राहणार आहे. निलंबित अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ताही दिला जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दक्षिण विभागाचे उपायुक्त राकेश कुमार, अधीक्षक अभियंता रणवीर सिंह, इमारत विभागाचे कार्यकारी अभियंता ललित कुमार गोयल, इमारत विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील चौहान आणि कनिष्ठ अभियंता आशिष कुमार यांचा समावेश आहे.
सत्य निकेतन परिसरातील एका दाट वस्तीतील इमारत रविवारी दुपारी कोसळली होती. या इमारतीत मुलांसाठी पेइंग गेस्टची व्यवस्था होती. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या तळघरात सुरू असलेल्या बांधकामामुळे संरचनेचे नुकसान झाले आणि अखेर संपूर्ण इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता व्यक्तींचा, प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा, शोध घेण्यासाठी बचाव आणि शोधमोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू होती.
दरम्यान, दिल्ली सरकारने चार किंवा त्यापेक्षा अधिक मजल्यांच्या बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा सर्व बेकायदा बांधकामांना त्वरित सील करण्यात यावे, तसेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे MCDने सोमवारी जारी केलेल्या नोटिशीत स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत P-14, सत्य निकेतन या क्रमांकाची होती. सुमारे ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाच्या भूखंडावर ही इमारत उभारण्यात आली होती. तिच्यात तळघरासह तळमजला आणि पहिल्या ते चौथ्या मजल्यापर्यंतचे बांधकाम होते. ही इमारत १९९०च्या दशकात बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या मालमत्तेबाबत बांधकाम आराखडा मंजुरीसाठी नोंद झाल्याचे, इमारत सील करण्यात आल्याचे किंवा तिच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल झाल्याचे महानगरपालिकेच्या नोंदीत आढळलेले नाही.
MCDच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, सत्य निकेतनमधील या इमारतीसाठी कोणताही मंजूर बांधकाम आराखडा अस्तित्वात नव्हता. त्याचबरोबर तळघरात सुरू असलेले बांधकामही अनधिकृत होते. या अनधिकृत बांधकामामुळे इमारतीच्या संरचनेला धोका निर्माण झाला आणि त्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुर्घटनेनंतर प्रशासनाने बचावकार्याला वेग दिला असून, ढिगारा हटविण्यासाठी JCB यंत्रांचा वापर सुरू आहे. रविवारी दुपारी इमारत कोसळल्यानंतर रात्रीभर बचावकार्य सुरू होते. सोमवारीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू राहिले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर MCDने संबंधित अधिकाऱ्यांवर केलेली तातडीची कारवाई ही प्रशासनातील जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.