‘सर तन से जुदा’ची तुलना ‘जय श्री राम’शी शक्य नाही

अलाहबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण? मौलाना तौकीर रजा खानचा जामीन फेटाळला

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
लखनौ,
allahabad high court ‘सर तन से जुदा’सारख्या चिथावणीखोर घोषणेची तुलना ‘जय श्री राम’ किंवा ‘अल्लाह हू अकबर’या धार्मिक घोषणांशी केली जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी बरेली हिंसाचारातील मुख्य सूत्रधार मौलाना तौकीर रजा खान याचा जामीन अर्ज फेटाळताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली.
 

allahabad high court rejects maulana tauqeer raza khan’s bail plea over bareilly violence 
 
 
२६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासनाने एका धार्मिक अभियानांतर्गत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला नकार दिला होता. त्याविरोधात तौकीर रजाने मुस्लिम समुदायाला इस्लामिया इंटर कॉलेजच्या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू असतानाही सुमारे २०० ते २५० लोकांचा जमाव एकत्र आला आणि त्यांनी श्यामगंज चौकाच्या दिशेने कूच केले. हातात फलक घेतलेल्या या जमावाने प्रक्षोभक घोषणाबाजी करत पोलिसांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. जमावातील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली, ॲसिडने भरलेल्या बाटल्या आणि गोळीबारही केला.या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे गणवेश फाटले. दोन अधिकारीही गंभीर जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता. या प्रकरणी मौलाना तौकीर रजा १३ ऑक्टोबर २०२५ पासून तुरुंगात आहे. ‘नारा-ए-तकबीर’, ‘अल्लाह हू अकबर’, ‘जो बोले सो निहाल’ आणि ‘जय श्री राम’ या श्रद्धात्मक घोषणा आहेत. त्यांची तुलना ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’सारख्या हिंसक घोषणेशी करणे अयोग्य आहे. अशा प्रकारची घोषणाबाजी म्हणजे देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेला दिलेले थेट आव्हान आहे, असे न्या. आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
स्वार्थासाठी जमाव जमवला
याचिकाकर्त्याने स्वतःचे धार्मिक आणि राजकीय हित साधण्यासाठी नमाजाच्या वेळेचा गैरफायदा घेतला. प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता एवढा मोठा जमाव गोळा करण्यात आला. रॅली रद्द केल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला असला, तरी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी हिंसाचार केला आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. अशा कृत्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
 
 
जामीन मंजूर करता येणार नाही
 
 
याचिकाकर्त्याविरुद्ध २१ डिसेंबर २०२५ रोजी दोषारोपपत्र दाखल झाले असून, अद्याप आरोप निश्चिती बाकी आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याचिकाकर्त्याला जामीन मंजूर करता येणार नाही, असे सांगत न्या. आशुतोष श्रीवास्तव यांनी मौलाना तौकीर रजा खान याचा जामीन अर्ज फेटाळला.