नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखाही अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरीही विविध राजकीय पक्षांच्यावतीने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात झाली असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता एका वृत्तवाहिनीने वर्तविली आहे.
राहुल गांधी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढविली होती. मात्र, तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. या मतदार संघातून पुन्हा स्मृती इराणी याच भाजपाच्या उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी नांदेड आणि रायबरेली मतदार संघाचा पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे.
रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ काँग्रेसचे गड मानले जातात . यातच तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी या कदाचित लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवितील असेही संकेत मिळत आहेत.