- 50 टक्के उपस्थिती
- उदय सामंत यांची माहिती
मुंबई,
राज्यातील सर्व महाविद्यालये येत्या 20 जानेवारीपासून 50 टक्के विद्यार्थी क्षमतेसह सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शनिवारी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवर विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी आभासी माध्यमातून संवाद साधला.
50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे आणि सहायक प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी सामंत म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मुंबईत स्थापन करण्यासाठी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रशिक्षणाच्या सर्व अभ्यासक्रमांना 15 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विधि प्रवेशांना सोमवार व मंगळवार अशी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक माहिती केंद्र उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. तसेच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.