अमरावती विभागातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम या जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव खुप मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. तसे आदेश विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी रविवारी काढले. विभागातील शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करुन प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे होणार आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागासाठी सुधारित निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना या सकाळी ९ ते सायं. ५ वा. पर्यंत सुरु राहतील, महानगरपालीका/नगर परिषद/नगरपालीका क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु राहील, सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC, अन्न व नागरी पुरवठा, FCI, N.Y.K., महानगरपालीका/ बँका सेवा वगळून) या १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील, सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना या एकूण १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील, ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा, शक्यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे/हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील, लग्न समारंभाकरीता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी अनुज्ञेय राहील, सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रीका तपासणे, निकाल घोषित करणे इ. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील.
मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूक साठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालकाव्यतीरिक्त इतर ३ प्रवासी अनुज्ञेय राहतील, तीन चाकीगाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतीरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेलमेट व मास्क सह २ प्रवासी यांना परवानगी राहील. आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशीसह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करुन वाहतूकीकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तीपर्यंत मर्यादीत स्वरुपात नागरिकांसाठी सुरु राहतील, ठोक भाजीमंडई सकाळी ३ ते ६ या कालावधीत सुरु राहील. परंतु सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, हे बंद राहतील.