Collective action शहरातील रामदास पेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या मोहम्मद अली चौक, बैदपुरा आणि मच्छी मार्केट परिसरात घरा-घरात होणार्या गोवंश कत्तली विरोधात जिल्हाधिकारी नीमा अरोरा आणि पोलिस पथकाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 26 गायी आणि 13 बैल जप्त करण्यात आले. तर मोठ्या प्रमाणात मृत गोवंशाची चामडी ताब्यात घेण्यात आली. अकोला शहरात होणार्या गोवंश कत्तली विरोधात जिल्हाधिकारी नीमा अरोरा आक्रमक झाल्या असून जिल्हाधिकार्यांनी पोलिस पथकासह बैदपुरा, मच्छी मार्केट परिसरात पहाटे 6 वाजता धाड टाकली. या परिसरात मोठ्या प्रमाणात घरा-घरात गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांना मिळाली होती.
Collective action या माहितीनंतर जिल्हाधिकारी नीमा अरोरा आणि रामदास पेठचे ठाणेदार किशोर शेळके यांनी पोलिस पथकासह हा परिसर पिंजून काढला. जिल्हाधिकारी ज्यावेळी या परिसरात धाड टाकत होत्या त्यावेळी परिसरात गोवंश कत्तल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरातील काही ठिकाणी गोवंश मांस असल्याचेही दिसून आले. यावेळी कत्तलीच्या उद्देशाने विविध ठिकाणी गाय आणि बैल बांधून ठेवले होते. तर मोठया प्रमाणात मृत गोवंशाच्या चामडीचा ढीग येथे आढळला. पोलिसांनी मृत गोवंशाची चामडी, गोवंश मांस आणि कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 26 गायी आणि 13 बैल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. जप्त केलेला गोवंश संगोपनासाठी आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्पाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांनी केलेल्या कारवाईत रामदासपेठ पोलिस स्थानकाच्या पोलिस पथकासह महानगरपालिकेचे पथक आणि पशु संवर्धन विभागाचे अधिकारी सहभागी होते. जिल्हाधिकार्यांनी अचानक केलेल्या धाडसी कारवाईमुळे गोवंश तस्करी आणि कत्तल करणार्यांना धड़की भरली असून या प्रकरणी गुन्हे दाखल करून पुढील तपास रामदासपेठ पोलिस करीत आहेत.