तभा वृत्तसेवा
दर्यापूर/अमरावती,
वाढलेल्या महागाईच्या विरोधात, शेतकर्यांना आर्थिक मदत, अग्निपथ योजना बंद करा, पीक कर्ज माफ करा, वीज बिल माफ करा, जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी कमी करा, या मागण्यांसाठी काँग्रेसने शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन (Congress movement) केले.
दर्यापूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, आ. बळवंत वानखेडे, बाळासाहेब हिंगणीकर यांनी तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी अभिजीत देवके, बबनराव देशमुख, बाळासाहेब टोळे, प्रदीप देशमुख, संजय बेलोकार , पद्मा भडांगे, अनुराधा खारोडे, रफिक सय्यद ,अजित देशमुख, राजू कराळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमरावती शहरात आंदोलन
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जीवनाश्यक वस्तूंवर वाढलेल्या जीएसटीमुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे सांगून शुक्रवारी अमरावती शहर काँग्रेस कमिटीने राजकमल चौकात निदर्शने केली. सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी शहराध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंजली ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्ते मोठ्या संख्येन हजर होते.