नागपूर,
Tree Planting : समस्त सृष्टीकरिता व मानवी जीवनाकरिता वृक्ष हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. परमेश्वराने या सुंदर सृष्टीचे निर्माण केले आणि आपल्याला निसर्ग रुपी अनमोल ठेवा बहाल केला पण हल्ली आपल्या देशात विकासाच्या नावावर व स्वतःच्या स्वार्थासाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे देशातीलच नाही तर संपूर्ण पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे याची अनुभूती आपण सर्वजण घेत आहोत 'ग्लोबल वार्मिंग' हा त्यातील एक भाग आहे.

ही फार मोठी समस्या आज संपूर्ण विश्वासाठी धोकादायक अशी आहे. निसर्ग मानवाला सदैव निस्वार्थ भावनेने भरभरून प्रेम, स्नेह देत असतो त्या बदल्यात आपलेही हे कर्तव्य आहे की आपण निसर्गावर तेवढेच किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम करावे व परमेश्वराचे आभार मानावे. विकास हा निश्चितच व्हायला हवा पण त्याचबरोबर वृक्षांचे व परमेश्वराने निसर्ग रुपी दिलेल्या अनमोल ठेव्याचेही रक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सहजीवनाची साखळी तोडण्याचे काम आज सर्वत्र सुरू आहे. एक वृक्ष हा मानवच नव्हे तर सूक्ष्म जीव, जंतू पशु, पक्षी या सर्वांना निस्वार्थ लाभ प्रदान करत असतो. वृक्ष तोडीनंतर सांगितले जाते जेवढे वृक्ष तोडले त्यापेक्षा जास्त वृक्षारोपण (Tree Planting) आम्ही करू पण बरेच वेळा तसे होत नाही व काही ठिकाणी वृक्षारोपण केले तरीपण त्याचे संवर्धन, देखभाल होत नाही संबंधितांकडून लक्ष दिले जात नाही आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे लावलेले छोटे रोपटे वाळून जातात. सरकारने या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे ही विनंती. 'वसुधैव कुटुंबकम' याप्रमाणे मानवाने चालावे तेव्हाच समस्त सृष्टीचे निश्चितच कल्याण होईल.
सौजन्य : आनंद कळमकर (संपर्क मित्र)