तभा वृत्तसेवा
धामणगाव रेल्वे,
येथील रेल्वेच्या मालधक्क्यामध्ये काम करणार्या 400 माथाडी कामगारांनी (Mathadi workers) शनिवारी आपल्या मागण्यांकरिता तीव्र आंदोलन करीत मालधक्क्यातील काम बंद ठेवले.

धामणगाव रेल्वे यार्ड येथे मशीनद्वारे ट्रक लोडिंग करण्याबाबत कामगारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे मशीनद्वारे ट्रक लोडिंग करणे सक्तीचे नसावे, मशीनद्वारे काम करण्याकरिता रेल्वेची पूर्वनियोजित योजना आहे काय, ही योजना कामगारांना बंधनकारक आहे काय, मशीनद्वारे काम करण्याकरिता कामगारांची मानसिकता तयार होण्याकरिता त्यांना वेळ देण्यात यावा, तात्पुरत्या स्वरूपात ट्रेनिंग म्हणून 3 वॅगन कामगार कार्यकुशल होईपर्यंत मजुरीचे सुधारित दर लागू करण्यात यावे, याची हमी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावी, माथाडी कामगार (Mathadi workers) काम करीत असताना अपघात किंवा दुखापत झाल्यास कामगारांना विमा संरक्षणासह रुग्णालय खर्च व वैद्यकीय प्रतिपूर्तीचे पूर्ण बिल मंजूर करण्यात यावे, ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मालधक्क्यावर फक्त नोंदणीकृत माथाडी कामगारांमार्फत हमालीचे काम करण्याचे अधिकार कामगारांना देण्यात यावे, अन्य नोंदणी नसलेले कामगार पूर्णत: बंद करण्यात यावे, कामगारांना नुकसान भरपाई किंवा 20 लाख रुपये देण्यात यावे तसेच मालधक्क्यावर भोजनगृह व्यवस्था व विश्रामगृह तसेच कामगारांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था गुड शेडवर करण्यात यावी, नोंदणीकृत माथाडी कामगारांची संख्या कोणत्याही दबावाखाली कमी करण्यात येऊ नये, या व अन्य मागण्यांकरिता कामगारांनी हे आंदोलन केले.
कामगारांनी कामावर यावे : जयस्वाल
माथाडी कामगारांच्या सर्वच मागण्यांबाबत उच्च अधिकार्यांसोबत चर्चा चालू असून याबाबत नक्कीच तोडगा निघेल आणि समस्यांचे निराकरण होईलच, त्यामुळे माथाडी कामगारांनी (Mathadi workers) व्यवस्थितरीत्या काम चालू ठेवावे असे रेल्वेच्या वतीने उपस्थित वाणिज्य पर्यवेक्षक जयस्वाल यावेळी म्हणाले. आंदोलनास्थळी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक जे. डी. कुलकर्णी, रेल्वे पोलिस अधिकारी छेदीलाल कनोजिया, मीना व जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अॅड. परडखे यांनी माथाडी संघटनेला आपला पाठिंबा घोषित केला.