कालबाह्य 370 बसेसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

दुरुस्ती केलेल्या बसेस सुसाट
खिळखिळया बसेस प्रवाशांसाठी धोकादायक

    दिनांक :15-Oct-2023
Total Views |
नागपूर,
ST buses : नागपूर विभागातील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, सावनेर, रामटेक आगारातून धावत असलेल्या बहुतांश बसेस जुन्या झाल्या आहे. साधारणतः 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ती बस रस्त्यांवर धावण्यास अयोग्य समजल्या जाते. नागपूर आगारातील 445 बसेस पैकी 370 बसेसचा कालावधी 15 वर्षांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान एसटीचा खरखर आवाज येत असतो. तर काही एसटी बसेसच्या टीन पत्रे झाल्याने ग्रामीणमध्ये अशा बसेस धावत आहे. वारंवार दुरुस्ती किंवा वेल्डींग करुन अशा बसगाड्यांची मलमपट्टी केल्या जात आहे. या खिळखिळया झालेल्या बसेस प्रवाशांसाठी आता धोकादायक ठरत आहे.
 
ST buses
 
सर्व नियम धाब्यावर
एसटी महामंडळाच्या (ST buses) नियमानुसार 12 लाख किमी धावलेली एसटी प्रवासी वाहतूकीतून रिटायर्ड करावे लागते. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून एसटी बसेस सुसाट धावत आहे. एसटीच्या काही हिरकणी बसेसने 12 लाख किमी पल्ला पार केल्यानंतरही त्या धावत आहेत. एकीकडे प्रवाशांची सोय तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी सुध्दा एसटी महामंडळात नव्या बसेस नसल्याने जुन्या बसेस चालविण्याशिवाय पर्याय नसल्याचे उत्तर महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून दिल्या जाते.
 
 
नव्या इलेक्ट्रीक बसेसची प्रतिक्षा
एसटीच्या बसेस (ST buses) जुन्या झाल्या असताना एसटीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रीक बसेस करिता प्रतिक्षा करावी लागत आहे. जुन्या बसेसमध्ये तांत्रिक तक्रारी वाढल्या असून विविध त्रुट्यांमुळे धावत्या एसटीला आग लागण्याच्या घटना होतात. यांत्रिकी विभागाच्या माहितीनुसार जुन्या बसच्या आतील वायरिंग कमकुवत झाल्याने आगीच्या घटना घडतात. एसटी महामंडळात आयुष्य संपलेल्या लालपरी धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बस चालविणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर उघड्या वायरिंगला मलमपट्टी करून वेळ मारून नेतात. बसच्या फिटनेसकडे दुर्लक्ष केल्याने एसटीला आग लागण्याच्या घटना होत असतात. यामुळे विनाकरण प्रवाशांचा जीव जात असल्याची प्रतिक्रिया इलेक्ट्रीक विभागातील तांत्रिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
नागपूर विभाग 1.61 कोटीने फायद्यात
एसटी महामंडळाकडे 22 हजार (ST buses) बसगाडयांची गरज असताना केवळ 14 हजार 500 जुन्या बसेस धावत आहे. यात नागपूर विभागातील बसेसचा समावेश आहे. प्रवासी संख्या व जुन्या बसेसची संख्या वाढल्याने आता नव्या 7 हजार 500 बसेसची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक व महिलांना सवलती दिल्या आहेत.यामुळे एसटीच्या नागपूर विभागातील प्रवासी संख्या वाढली असून इतर विभागापेक्षा नागपूर विभाग मात्र 1.61 कोटीने फायद्यात असल्याची माहिती महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.
 
नव्या बसेस सुरु करा
नागपूर विभागातील अनेक (ST buses) बसेस आयुष्य संपलेल्या आहेत, तरीही रस्त्यांवर अशा एसटी बसेस धावतात, एसटी महामंडळाने नव्या बसेस सुरु करुन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी संकेत ठाकरे या प्रवाशांनी केली आहे.
 
 
एसटीचा प्रवास सुखकर व्हावा
गणेशपेठ डेपोसह इतर सर्व डेपोत विशेषत: ग्रामीण भागातील अनेक मार्गावर कालबाह्य बसेस धावत आहे,यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. एसटी महामंडळाने नव्या बसेस सुरु करुन प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा,अशी मागणी रेखा पाठराबे यांनी केली आहे.
 
 
फिटनेसवर सर्वाधिक लक्ष
एसटी बसेसच्या (ST buses) फिटनेसवर सर्वाधिक लक्ष दिल्या जात आहे.याशिवाय कालबाह्य बसेस लांब पल्ल्यातून हटविण्यात आल्या आहेत. आता नव्या इलेक्ट्रीक बसेस प्रत्येक विभागात येत आहे. एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी नव्या बसेस लांब पल्ल्यात मार्गावर सुरु केल्या जात असल्याची माहिती एसटीचे विभागीय अधिकारी शेखर गभणे यांनी दिली.