शुद्धबीजा पोटी।फळे रसाळ गोमटी॥

    दिनांक :15-Oct-2023
Total Views |
तुका आकाशाएवढा
- प्रा. मधुकर वडोदे
जगात चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. त्याचे मूळ काय असेल? तर ते देखील शोधणे महत्त्वाचे आहे. Saint Tukaram Maharaj अनेकांना या जाणिवेचे तथ्य समजत नाही. एखाद्या व्यक्तीला समाजोपयोगी कार्य करण्याची आवड का आहे? तर, एखादी व्यक्ती अनेकांशी दुष्ट भावनेने का वागते? याचा आपण विचार करायला तयारच नसतो. केवळ त्याला दोषी ठरविणे किंवा विजयी ठरविण्यापलीकडे विचारच करत नाही. त्यामुळे आपली बर्‍याच वेळा फसगत होताना लक्षात येते. आपलं चरित्र चांगलं असावं. काम करताना ते शुद्ध भावनेनं करावं. कुणाचंही वाईट होणार, याची काळजी आपण घेतली पाहिजे. परंतु, हा चांगला विचार आपल्या मनात येण्याकरिता आपल्यावर चांगले संस्कार होण्याची तेवढीच गरज आहे. लहान असतानाच जर आपल्या आई-वडिलांनी चांगले संस्कार जर केले असतील तर आपण मोठेपणी समाजसेवा वा कौटुंबिक सुख देण्यास समर्थ ठरू शकतो. म्हणून बालपणीचे मनावर झालेले संस्कार अत्यंत मोलाचे व महत्त्वाचे ठरतात. उदाहरणच घ्यायचे असेल तर कुंभार मातीचा घडा तयार करण्याच्या हेतूने सर्वप्रथम मातीची निवड करतो.
 
 
plant
 
योग्य मातीची निवड केल्यानंतर मेहनत करून घडा बनविण्याच्या हेतूने तिच्यावर अनेक संस्कार करताना दिसतो. त्याकरिता योग्य असे साहित्य जमा करून योग्य वापर करतो. पाण्याचे योग्य प्रमाण ठरवून मुलायम गारा तयार करतो. काही वेळानंतर एकरूप झालेला गारा चाकावर ठेवून त्या चाकाला पाहिजे तेवढी गती देतो. तेव्हा त्याला जसा आकार द्यावयाचा आहे त्याप्रमाणे आकार देऊन घडा तयार करतो. नंतर त्याला पक्के रूप प्रदान करण्याच्या हेतूने अग्नी भट्टीत ते भाजून काढतो. तेव्हा त्या घड्याला मूर्त स्वरूप प्राप्त होत असते. याचाच अर्थ असा की, घटाला मूर्त स्वरूप देण्याकरिता सर्व प्रकारचे एवढे सारे संस्कार करताना तो दिसतो. एक वेळ तयार झालेला घट मात्र मग शेवटपर्यंत आहे तसाच राहतो. मग त्यामध्ये कोणताही बदल करणे शक्यच होत नाही. हे बदलाचे काम मग कठीण होऊन बसते. बदलाचा प्रयत्न केल्यास तो तुटतो, भंगतो. म्हणूनच संस्कार हे लहानपणी करणे जास्त सोयीचे असतात. म्हणूनच आई-वडिलांनी चांगले संस्कार आपल्या मुलांवर लहानपणी केले असतील तर बाळ सुसंस्कृत होतं. त्याकडून आपण चांगल्याच अपेक्षा करू शकतो. असं हे शुद्ध चारित्र्य, वर्तन तेव्हाच आपल्या द़ृष्टीस पडेल तेव्हा ते सर्वांच्याच हिताचं असते. हेच या अभंगाच्या माध्यमातून Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांना सांगायचे आहे.
 
शुद्धबीजा पोटी। फळे रसाळ गोमटी॥
मुखी अमृताची वाणी। देह देवाचे कारणी॥
सर्वांग निर्मळ। चित्त जैसे गंगाजळ॥
तुका म्हणे जाती। ताप दर्शने विश्रांती॥ अ. क्र. 37.
Saint Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराज सांगतात की, चांगली अपेक्षा कुणाकडून करावी? तर त्याचेही काही मापदंड ठरलेले आहेत. आम्रवृक्षापासून मधुर फळांची अपेक्षा केली जाते. परंतु आपण म्हणाल की, बाभळीच्या झाडापासून केली तर काय हरकत आहे? आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की, बाभळीचे झाड तुम्हाला आयुष्यभर काटेच देईल तर आयुष्यभर आम्रवृक्ष मधुर फळेच. कारण जसं बीज लावलं तसं त्याला फळ येत असतं.
 
 
आयुष्यात आपण कार्य करीत असताना सन्मार्गाने जर चालत असू, नैतिक काम करत असू तर त्याचे संस्कार आपल्या मुलांवर होत असतात. कारण ते आपणास लहानपणापासून पाहात असतात, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. आपणच जर व्यसनाधीन असाल तर पुढे चालून त्याचा परिणाम मुलांवर नक्कीच दिसून येतो. आपण जाणीवपूर्वक दुष्टवृत्तीच्या लोकांचा जवळून अभ्यास केला तर त्यांचा मुलगाही तोच मार्ग आनंदाने स्वीकारताना दिसतो. बाप जर चोरी करत तर मुलगाही त्याच वळणावर जाताना दिसतो. तोही पुढे चोर बनतो. तसेच दुसर्‍यापेक्षा सुखी होणं या इच्छेच्याही मुळाशी तुलना आली आणि तुलनेतूनच मत्सराचा जन्म होतो. या मत्सरामुळेच सुख नष्ट होते. म्हणून मत्सरही करू नये. टोपीवाला आणि माकडाची गोष्ट संस्काराचं चांगलं उदाहरण आहे. ते असं की, टोपीवाला झाडाखाली झोपतो आणि उठून पाहतो तर त्याच्या सर्व टोप्या गायब झालेल्या असतात. झाडावरच्या माकडांनी त्या पळवलेल्या असतात. मग टोपीवाला झाडाच्या वर पाहतो आणि माकडांच्या डोक्यात असलेल्या त्या टोप्या मागायला लागतो. माकडे त्याची नक्कल करू लागतात.
 
 
दगड मारल्यावरही ते टोप्या खाली टाकत नाही. शेवटी टोपीवाला स्वत:च्या डोक्यातली टोपी काढून फेकतो, परंतु माकडं मात्र टोप्या खाली फेकतच नाही. त्यातलं एक छोटं माकड फांदीला लटकत हसत खिदळत त्याला म्हणतो, ‘‘अरे तुझ्या बापानं जशी अक्कल तुला शिकवली तशीच आम्हालासुद्धा आमच्या बापानं शिकवलं आहे.’’ आपल्या लक्षात आलंच असेल की, वंश जसा असेल तसाच त्याचा विस्तार होत जातो. आई-बापाचेच गुण त्यांच्यामध्ये उतरताना दिसतात. आपण पाहत आलो की, शिक्षकाचा मुलगा शिक्षक, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, ऑफिसरचा मुलगा ऑफिसर, मजुराचा मुलगा मजूर होताना दिसतो. जसे बीज तसे फळ निर्माण होत असते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपणा सर्वांना उपदेश केला की, सत्कर्म करा. नीतिमत्तेने व्यवहार करा, आपलं आचरण शुद्ध ठेवा, मत्सर करू नका, चांगल्याची संगत सोडू नका, खरे बोला. मोठ्यांचा आदर करा. नवीन शिकण्याची वृत्ती ठेवा. आपण जर अशी चांगली वर्तणूक ठेवली तर त्यांचे संस्कार येणार्‍या पिढीवर पडतील. निश्चितच आपलाच वंश चांगला सत्कर्म करेल. समाज स्वास्थ्य बिघडणार नाही. अशा या वृक्षाला लागलेल्या फळांची गोडी मधुर असून ते चांगले रसाळ व सुंदर असतील. कारण याचा समाजमनावर खूप चांगला आविष्कार नजरेस पडेल व आपणही जीवन जगण्याचा चांगला आनंद मिळविण्यात यशस्वी होऊ.
 
 
Saint Tukaram Maharaj : संसार सागरात आपला चांगला निभाव लागावा. आयुष्य हे आनंदी आनंदमय व्हावं असं जर वाटत असेल तर आपला देह केवळ आपल्या उपयोगासोबतच इतरेजनांकरिताही झिजवावा. निष्क्रिय न राहण्याचा सावधपणा अंगी बाळगावा. अशा वृत्तीने आपण जगलो तर चांगले परिणाम हे येणार्‍या पिढीवर निश्चित दिसतील. बर्‍याच कार्यालयात आपण एक गोष्ट नेहमी अनुभवत असतो. ते असे की, आधीच्या कर्मचार्‍याने काम केले नाही; मग मी ते कशाला करू? अशी मानसिकता नको. कारण त्याने काय केले, यापेक्षा आपण काय करतो, हे पाहायला पाहिजे. तरच आपण आनंदी राहू शकतो. जसे गंगेचे पाणी निर्मळ शुद्ध आहे. त्यामुळे अनेक पतितपावन झाले. अशा प्रकारचा जीवन प्रवाह निर्मळ ठेवला तर आपल्या सहवासात येणार्‍यांचंही जीवन चांगलंच राहील. रोग्यांच्या सहवासात आलो तर रोगी होऊ. आपल्याला ठरवावयाचं की, कुणाच्या संगतीत राहावं. चांगल्या वृत्तीच्या लोकांसोबत संगत धरल्यास आपण तर सुखी होऊच; पण आपल्याबरोबर समाजातील अनेक दु:खी लोकांचं दु:ख दूर करण्यास आपली मदत होईल. त्यांच्या मनाला सुख-शांती मिळेल. म्हणून शुद्ध अंत:करणाने कार्य केल्यास सर्वांनाच जीवन जगण्याचा आनंद घेता येईल. त्यांची मन:शांती करता येईल. येणार्‍या पिढीवर चांगले संस्कार करता येतील. अशा प्रकारचा सुंदर सुरेख समाजोपयोगी उपदेश केलेला आहे.
-9422200007