नवी दिल्ली,
Soumya murder case : पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील पाचही आरोपींना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या घटनेला 15 वर्षांनी ही शिक्षा झाली आहे. आता या प्रकरणातील शिक्षेवर 26 ऑक्टोबर रोजी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. 30 सप्टेंबर 2008 रोजी सौम्या तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिला चालत्या कारमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर साकेत न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. 30 सप्टेंबर 2008 रोजी दुपारी साडेतीन वाजता सौम्या आपल्या कारमधून घरी परतत असताना तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी या हत्येमागे दरोडा असल्याचा दावा केला होता.
सौम्याच्या हत्येप्रकरणी (Soumya murder case) रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी या पाच जणांना अटक करण्यात आली असून, हे सर्व आरोपी मार्च 2009 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली पोलिसांनी या सर्व आरोपींवर मकोका लावला होता. आयटी प्रोफेशनल जिगीशा घोष यांच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त झाल्याने विश्वनाथन खून प्रकरणाचे गूढ उकलल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मलिक यांनी 2019 मध्ये उच्च न्यायालयात जलद खटला चालवण्याची विनंती केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल होऊन साडेनऊ वर्षे उलटूनही सुनावणी का पूर्ण झाली नाही, याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयाकडून मागवला होता.
खटल्यातील साक्षीदारांची अनुपस्थिती आणि विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीला लागणारा वेळ हे विलंबाचे प्राथमिक कारण असल्याचे ट्रायल कोर्टाने उच्च न्यायालयाला सांगितले होते. (Soumya murder case) ऑगस्ट 2016 मध्ये कपूर आणि शुक्ला यांना कनिष्ठ न्यायालयाने जिगिषा घोष हत्याकांडात फाशी आणि मलिक यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण जानेवारी 2018 मध्ये उच्च न्यायालयाने कपूर आणि शुक्ला यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलून मलिक यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.