विचार सत्यात उतरवणारी माणसेच इतिहास घडवितात

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे प्रतिपादन , शरद व्याख्यानमाला

    दिनांक :30-Oct-2023
Total Views |
कारंजा लाड, 
Collector Anjali Dhanorkar राज महालात वाढणार्‍या सिद्धार्थाने जगाचे दुःख पाहिले, सम्राट अशोकाने रक्तरंजित लढाया केल्यानंतर युद्धाची खरंच गरज आहे का? यावर चिंतन केले, इंग्रजांकडून होणार्‍या अपमान जनक छळाला प्रत्युत्तर म्हणून इंग्रजांना देशाबाहेर घालविणारे महात्मा गांधी, अन्याय करणार्‍या एवढाच अन्याय सहन करणारा हा दोषी असतो हा विचार सोबत घेऊन ज्यांचा प्रवास महामानवापर्यंत पोहोचला असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ..या सर्व महापुरुषांनी आपले विचार सत्यात उतरवून त्यांनी इतिहास घडवला, असे मत छत्रपती संभाजी नगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी व्यक्त केले.
 
 
Collector Anjali Dhanorkar
 
कारंजा येथे सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. विचारांना सत्यात उतरवा हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके यांनी त्यांचे स्वागत केले तर गुंजन चवरे यांनी वत्यांचा परिचय करून दिला. Collector Anjali Dhanorkar पुढे बोलतांना धानोरकर म्हणाल्या की, चांगला विचार हा समाजाचा हीत साधणारा असतो; म्हणून तुमच्या मनात येणार्‍या विचारांची बैठक पक्की असावी, जे सत्य आहे ते निर्भीडपणे मांडले पाहिजे. गॅलिलीओने पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असा विचार मांडला तेव्हा धर्ममार्तंडांनी त्याला जेलमध्ये टाकले. त्याचा अतोनात छळ केला, सॉक्रेटिसला तर आपल्या क्रांतिकारी विचारापायी जीव गमावा लागला. मात्र पुढे त्याचेच विचार जगाने स्वीकारले.
 
माणसाला एका दिवसात हजारो विचार येतात मात्र त्यातील एखादा विचार आपण दृढपणे पकडून ठेवला तर त्यावर आपण देहभान विसरून काम करु शकतो. बिहारच्या दशरथ मांझी या गरीब माणसाला जेव्हा त्याच्या गर्भवती पत्नीला दवाखान्यात नेण्याकरता पहाडी अशा दुर्गम भागाचा अतोनात त्रास झाला तेव्हा त्याने पहाडातून रस्ता निर्माण करण्याचा निश्चय केला, आणि तो सत्यात उतरविला. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगाचे दुःख पाहून त्यांच्या जीवनाचे नंदनवन बनविले. आणि अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंनी सुद्धा आपल्या विचारांना मूर्त रूप दिल्याचे धानोरकर म्हणाल्या.
 
आपले विचार संवेदनशील व विवेकशील असले तरआपली अनेक संकटे दूर होतील हा मुद्दा पटवून देताना त्या म्हणाल्या की, गर्दीत तुमच्या पायावर एखाद्याचा जर पाय पडला तर तुम्ही तात्काळ रिऍट होता मात्र चुकून पडला असेल या जाणीवने तुम्ही दुर्लक्ष केले तर संभावित भांडणे टळू शकतात. संवेदनशीलतेमुळे तुमचे विचार कृतीत परिवर्तित होतात, अन्याय, अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहणारी माणसं ही स्वतःला सभ्य समजत असल्याने ते अत्याचाराला वाचा फोडू शकत नाहीत. त्यामुळे सभ्य माणसांचे मौन हे अति घातक ठरते. कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता ती भीती दूर करणारा प्रबळ विचार तुम्ही सकारात्मकतेने दूर करू शकता असे डॉटर अल्बर्ट एलिस या मानसोपचाराने आपल्या कृतीने सिद्ध करून दाखविले. पूर्वजांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले आहे, मात्र ज्या काही वाईट गोष्टी समाजात सुरू आहेत त्यासाठी सर्वांनी संकोच बाजूला ठेवून पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कविता मिसाळ यांनी तर आभार स्नेहल कहाते यांनी मानले. निशिकांत परळीकर यांनी शारदा स्तवन म्हटले.