वाशीम,
water planning यावर्षी पावसाळा सरासरीपेक्षाही कमी झाला. त्यामुळे काही गावात हिवाळ्यातच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तेव्हा, पुढील पाच महिने येणारा उन्हाळा व भविष्याचा विचार करता आतापासूनच पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. वाशीम जिल्ह्यातील शेकडो गावातील विहिरी आटल्या असून, पाण्याची पातळी सुध्दा खोल गेली आहे. आगामी पाणी टंचाई लक्षात घेता भूगर्भातील पाणी काढण्यासाठी विंधन विहिरी खोदण्याचा सपाटा सुरू आहे. उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटणार यात शंका नाही. त्यासाठी प्रशासनाने आतापासून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. काही शहर व गावात सध्या मुबलक पाणी असेलही पण, त्याचा वापर नियोजनबध्द न झाल्यास ते संपण्यास फार उशिर लागणार नाही.
पाणी ही अशी नैसर्गिक संपत्ती आहे की, त्यावर आजपर्यंत मानवाला कोणताच पर्याय शोधता आला नाही. विज्ञान कितीही पुढे गेले असेल तरी, वैज्ञानिकांना आजपर्यंत पाणी तयार करता आलेले नाही. तेव्हा, पाण्याचा काटकसरीने वापर हाच एकमेव पर्याय आहे. म्हणून नागरीकांना देखील पाण्याचा अतिशय जपून वापर करणे गरजेचे आहे. शासन पाणी टंचाई निवारणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देऊ शकते. पण, पाणीच उपलब्ध नसेल तर तो पैसा काहीच उपयोगाचा राहणार नाही. तेव्हा, भविष्याचा विचार करुन नागरीकांनी आजपासूनच उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरले पाहीजे,water planning असे म्हणावेसे वाटते.डिसेंबर मध्येच काही गावातील परिस्थीती पाणी टंचाईबाबत भयावह आहे. ग्रामस्थांना कोसोदूर पायदळी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासन पाणी टंचाई निवारणार्थ दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. आजही अनेक गावात नविन विहिरी व पाणी पुरवठा योजनेची कामावर लाखो रुपये खर्च झाला. परंतु, सदर योजना आजही बंद आहेत. काही पाणी पुरवठा योजनेची कामे निकृष्ट झाली. तर काही योजना निधी अभावी बंद पडल्या आहेत. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढण्यास शासन व प्रशासनाला यश आले नाही. प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेची कामे करतांना त्यावर विशेष लक्ष ठेऊन ती कामे पूर्ण करुन घ्यायला पाहीजे. नाहीतर नेहमीची येतो उन्हाळा अन् पाणी टंचाई हे चक्र सुरूच राहणार.