काठमांडू,
Ram Mandir : पुढील महिन्यात अयोध्येत होणार्या राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध प्रकारांचे दागिने, भांडी, कपडे आणि मिठाई असलेली विशेष स्मृतिचिन्हे नेपाळ पाठवणार असल्याचे रविवारी येथील माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. जनकपूरधाम-अयोध्याधाम असा प्रवास करून ही स्मृतिचिन्हे पोहोचणार आहेत, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. 18 जानेवारीपासून सुरू होणारा हा प्रवास 20 जानेवारीला अयोध्येत संपेल आणि त्याच दिवशी ही स्मृतिचिन्हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाकडे सोपवली जातील, असे जानकी मंदिराचे संयुक्त महंत रामरोशन दास वैष्णव यांनी सांगितले.
राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा Ram Mandir सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. जनकपूरधाम येथून हा प्रवास जलेश्वर नाथ, मलंगवा, सिमरौनगड, गढीमाई, बीरगंज ते बेतिया, कुशीनगर, सिद्धार्थनगर, गोरखपूरमार्गे उत्तरप्रदेशातील अयोध्येला पोहोचेल. यापूर्वी नेपाळमधील कालीगंडकी नदीकाठावरून गोळा केलेले शाळिग्राम प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती घडवण्यासाठी अयोध्येला पाठवण्यात आले होते. याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे.