Nana Patole : अवकाळी पावसाने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेतकर्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला, पण सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी केला.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले Nana Patole यांनी सरकारवर तोफ डागली. शेतकर्यांच्या प्रश्नावर भाजपा सरकार गंभीर असते तर विरोधी पक्षाच्या स्थगन प्रस्तावावार सभागृहात चर्चा झाली असती. पण हे सरकारच शेतकरी विरोधी असल्याने त्यांनी चर्चा करणे टाळले. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत आहेत. विदर्भातील प्रश्नावर चर्चा करु म्हणणारे भाजपाचे सरकारच विदर्भातील शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चाच करत नाही. हे सरकार 14 कोटी जनतेशी खोटे बोलत आहे. शेतकर्यांना मदत करायची आहे की नाही ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही कमी आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत पर्यटनासाठी हे लोक आहेत. जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही.
धानाला एक हजार रुपये बोनस द्या
विदर्भातील शेतकरीही अनेक समस्यांना तोंड देत आहे. अजून खरेदी केंद्रे सुरु झाली नाहीत. शेतकर्याचे धान व्यापारी 400-500 रुपये कमी दराने खरेदी करत आहेत. भाजपा सरकार शेतकर्यांच्या धानाला भावच मिळू देत नाही. धानाला अजून बोनसही जाहीर केलेला नाही. सरकारने धानाला एक हजार रुपये बोनस दिला पाहिजे अशी मागणीही पटोले Nana Patole यांनी केली आहे.