नवी दिल्ली,
Defense Budget : लडाखसोबतच अरुणाचल प्रदेशातही चीनसोबतच्या सीमेचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. याचबरोबर पाकिस्तान काश्मीरमध्येही आपल्या नापाक कारवाया करत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आज देशाच्या संरक्षण बजेटमध्ये १३ टक्के वाढ करण्यात आली असून, त्याअंतर्गत संरक्षण मंत्रालयाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५.९४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, मागील अर्थसंकल्पात (Defense Budget) संरक्षण क्षेत्रासाठी 5.25 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु ती आता 13 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे, जी 5.94 लाख कोटी रुपये आहे. ही रक्कम एकूण बजेटच्या 8 टक्के आहे. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बजेटचा मोठा भाग सैनिकांच्या पगार आणि पेन्शनवर खर्च होत असला तरी त्यामुळे लष्कराला हायटेक करण्यावरही भर दिला जाणार आहे. संरक्षण क्षेत्रात यंदाही देशाला स्वावलंबी बनवण्यावर सरकारचा भर आहे.
तर दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण बजेटमध्ये (Defense Budget) वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशात सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे आम्हाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि काही वर्षांत टॉप-3 अर्थव्यवस्था बनण्याचे आमचे लक्ष्य साध्य होईल. विकास आणि कल्याणाभिमुख धोरणांना पाठिंबा देण्याबाबत सरकारची वचनबद्धता या अर्थसंकल्पातून दिसून येते. याचा फायदा लहान व्यावसायिक, सामान्य माणसांना होईल.