नवी दिल्ली,
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात मिशन Amrit Sarovar अमृत सरोवर या उपक्रमाचा 24 एप्रिल 2022 रोजी प्रारंभ झाला. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवरे बांधण्याचे किंवा असलेल्या सरोवरांचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेंतर्गत निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 50,000 अमृत सरोवर बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोहीम सुरू झाल्यापासून अवघ्या 9 महिन्यांच्या अल्पकाळामध्ये 30,000 हून अधिक अमृत सरोवरे बांधण्यात आली आहेत. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 60 टक्के आहे.
यासाठी सहा केंद्रीय मंत्रालये संयुक्तपणे काम करीत आहेत. यामध्ये ग्रामीण विकास, रेल्वे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलशक्ती, पंचायती राज, पर्यावरण, वन आणि हवामान बदल हे मंत्रालय कार्यरत आहेत. तसेच तांत्रिक संस्था म्हणून, भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅप्लिकेशन्स अॅण्ड जिओ-इन्फॉर्मेटिक्स (बीआयएसएजी-एन) आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारे एकत्रितपणे कार्यरत आहेत. या एकूण मिशनचे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे मंत्रालय आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांकडून सीमांकित Amrit Sarovar अमृत सरोवर स्थानी उत्खनन केलेली माती, गाळ यांचा वापर परिसरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केला जात आहे.
विविध सार्वजनिक आणि सीएसआर संस्थांनीही या मिशनमध्ये खूप रस दाखवला आहे आणि देशभरातील अनेक अमृत सरोवरांच्या बांधकाम/पुनरुज्जीवनात योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे मिशन अमृत सरोवर ग्रामीण जीवनमानाला चालना देत आहे. पूर्ण झालेले सरोवर सिंचन, मत्स्यपालन, बदक पालन, शिंगाड्याची लागवड आणि पशुसंवर्धन इत्यादी विविध उपक्रमांसाठी फायदेशीर ठरत आहे. अमृत सरोवर मिशनचे उद्दिष्ट अमृत सरोवराची गुणात्मक अंमलबजावणी आणि स्थानिक सामुदायिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून विकास करणे तसेच Amrit Sarovar अमृत सरोवर कार्यासाठी विविध मंत्रालयांनी संयुक्त कार्य करणे, हे सुद्धा आहे.