इस्लामाबाद,
पाकिस्तानच्या (Pakistan water crisis) संकटांची मालिका अजूनही थांबताना दिसत नाही. प्रचंड महागाई, बेरोजगारी, अराजकतेचा सामना करत असतानाच पाकिस्तानवर मोठे जलसंकट कोसळले असून येथील कोट्यवधी नागरिकांना दूषित पाणी पिऊन जगावे लागत आहे. एशियन लाईटने याविषयीचा एक अहवाल जारी केला आहे. या अहवालाने पंतप्रधान शाहबाज शरीफची झोप उडवली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानातील 24 प्रमुख शहरांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणीच उपलब्ध नाही. स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वात मोठे जलसंकट असल्याचे सांगितले जात आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) यासंदर्भात पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजूनही पाकिस्तानी सरकारने यासंदर्भात ठोस पावले उचलली नाहीत तर 2025 पर्यंत (Pakistan water crisis) पाकिस्तान पूर्णत: कोरडे आणि पडीक होईल. पाकिस्तानात सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याची गुणवत्ता अतिशय सुमार दर्जाची आहे. त्यात शौचालयातील पाणी आणि घाणही असल्याचे दिसून आले आहे. या प्रकाराने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 60 टक्क्यांहून अधिक लोकांच्या पिण्याच्या पाण्यात आर्सेनिकची धोकादायक पातळी दिसून आली आहे.
पाकिस्तानातील (Pakistan water crisis) प्रमुख शहरांपैकी एक असणार्या कराचीमध्ये तर स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. येथील विमानतळालाही पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे समजते. आर्थिक संकटांचा सामना करणार्या पाकिस्तानी जनतेला अन्न मिळणे महागले असताना पिण्याचे पाणीही न मिळाल्यास येथे स्थिती गंभीर होण्यास वेळ लागणार नाही. श्रीलंकेसारखी स्थिती पाकिस्तानात निर्माण होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.