तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Forest area : सामूहिक वनहक्क मिळालेल्या 767 गावांना व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी गावांच्या वनहककाचे क्षेत्र निश्चित करून देणे आवश्यक आहे. यासाठी पंचायत समिती, महसूल विभाग, पुसद व पांढरकवडा प्रकल्प अधिकारी यांनी वन विभागाशी समन्वय साधून गावांचे वनक्षेत्र निश्चित करून त्याप्रमाणे वनविभागाकडून नकाशे उपलब्ध करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय अभिसरण समितीची (Forest area) आढावा बैठक मंगळवार, 28 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी याशिनी नागराजन, उपवनसंरक्षक किरण जगताप, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्हाडे, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपमु‘य कार्यकारी अधिकारी, पंचायत, तहसीलदार, भाग्यश्री देशमुख उपस्थित होते.
जिल्हास्तरीय अभिसरण समिती प्रमाणेच तालुकास्तरावर सुद्धा तालुकास्तरीय अभिसरण समिती गठीत करावी. तसेच या समित्यांचे बँकेमध्ये खाते उघडावे. त्याचबरोबर तालुकास्तर समितीने प्रत्येक महिन्याला समितीची बैठक घेऊन आराखडे तयार करण्याबाबत पाठपुरावा करावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी समित्यांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या समित्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण घेताना क्लस्टरनिहाय प्रशिक्षण घ्यावे जेणेकरून समित्यांना सूक्ष्म प्रशिक्षण देता येईल. तसेच त्यांच्या अडचणी सोडवता येतील. प्रशिक्षण झाल्यानंतरसुद्धा व्यवस्थापन आराखडे पूर्ण करण्यासाठी गावांना जिल्हा समिती सपोर्ट आणि मार्गदर्शन करेल.
पुढील चार महिन्यांत प्रशिक्षण आणि व्यवस्थापन आराखडे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेल्या 873 व्यक्तींना कृषी विभागाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच सर्व विभागांनी वन हक्क प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांची आर्थिक उन्नती होईल याकडे लक्ष द्यावे. सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या गावांमध्ये रोहयोमधून 21 प्रकारची कामे घेता येतात. यामध्ये वनविभागाची कामे मोठ्या प्रमाणात आहेत. वनविभागाने पुढाकार घेऊन ही कामे त्या-त्या गावांमध्ये सुरू करावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.