९७ वे साहित्य संमेलन अमळनेरला होणार

23 Apr 2023 15:16:58
पुणे, 
साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत ९७ वे साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यातून अखेर अमळनेरची निवड करण्यात आली. ५०च्या दशकानंतर पाहिल्यांदाच साने गुरुजींच्या कर्मभूमीत हे ९७ वे साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. त्यामुळे साऱ्यांच्या साक्षीने व सहकार्याने अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलायला सक्षम आहे.
 
Sahitya Sammelan
 
९७ व्या साहित्य संमेलनासाठी (Sahitya Sammelan) महामंडळातर्फे स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे सहभागी झाले होते. या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर सातारा येथील संस्थेचे दृक्-श्राव्य सादरीकरण पाहिले आणि तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड करण्यात आली. त्यामध्ये समितीने सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या संस्थेची शिफारस केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्यांव्यतिरिक्त प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते. 
 
Powered By Sangraha 9.0