नवी दिल्ली,
विविध ठिकाणांवरून सुनावणीसाठी हजर राहता यावे म्हणून सुटीकालीन न्यायासने मिश्र पद्धतीने सुनावणी करेल, अशी माहिती (Dhananjay Chandrachud) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी दिली. न्यायासने नवीन प्रकरणेही स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाला 22 मे ते 2 जुलैपर्यंत उन्हाळ्याची सुटी लागत आहे आणि तातडीच्या प्रकरणांवर केवळ सुटीतील न्यायासनेच सुनावणी करतील. मंगळवारच्या सुनावणीच्या सुरुवातीला सरन्यायाधीश म्हणाले, सुटीतील न्यायासन नवीन प्रकरणे हाती घेतील आणि मिश्र पद्धतीने सुनावणी केली जाईल. या सुनावणीसाठी वकील त्यांच्या संबंधित ठिकाणांवरून आभासी पद्धतीने उपस्थित राहू शकतात.
जर एखाद्याला सोयिस्कर ठिकाणावरून युक्तिवाद करायचा असेल तर, तुमचे स्वागत आहे. मात्र, वकिलांनी योग्य पोशाख केला पाहिजे, असे न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डिवाला यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने सांगितले. ज्या 300 पेक्षा जास्त प्रकरणांची दखल घेतली जाऊ शकली नाही, ती सुटीतील न्यायासनांसमोर सूचीबद्ध केली जातील. सुटीकालीन न्यायासनांवर असलेले न्यायमूर्तींनी नवीन प्रकरणे घेण्यासाठी सहमती दर्शवली असल्याचे (Dhananjay Chandrachud) त्यांनी सांगितले.