‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे 82 टक्के भारतीय चिंतेत

    दिनांक :07-May-2023
Total Views |
तिरुवनंतपुरम्,
Global Warming : ‘येल प्रोग्राम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशन’ आणि ‘सी व्होटर इंटरनॅशनलच्या ग्लोबल वॉर्मिंग्ज 4 इंडियाज 2022च्या अहवालानुसार, 82 टक्के भारतीय ग्लोबल वॉर्मिंगबद्दल चिंताग्रस्त असल्याचे समोर आले आहे. प्रचंड औद्योगिकीकरण, अंदाधुंद शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेक दशकांपासून आपण पर्यावरण आणि जागतिक तापमानवाढ याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याचे भीषण दुष्परिणाम जाणवू लागल्यानेच भारतीय नागरिक मोठ्या संख्येत या विषयावरून चिंतेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
Global Warming
 
‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे (Global Warming) 82 टक्के भारतीय चिंतेत असल्याचे तर, उर्वरित 18 टक्के या समस्यांबाबत निष्क्रिय असल्याचे ‘येल प्रोग्राम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशन’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालासाठी ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत 4,619 भारतीयांशी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. संपर्क केलेल्या लोकांपैकी 82 टक्के भारतीय हवामान बदलाविषयी चिंतित आहेत.
 
 
अहवालानुसार, 54 टक्के भारतीय चिंताग्रस्त असून, या लोकांना खात्री आहे की, जागतिक तापमानवाढीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. 29 टक्के नागरिकांनी हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी, त्याबद्दल फार माहिती नसल्याचे सांगितले. 11 टक्के लोकांना हा मुद्दा माहीत असून, त्याचे परिणाम लगेच होणार नसल्याचे म्हटले आहे. तर, 7 टक्के लोकांनी या विषयावर अद्याप विचार केलेला नाही. चार प्रकारच्या भारतीयांमध्ये (Global Warming) ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या धोक्याची धारणा लक्षणीयरीत्या भिन्न आहे. उदाहरणार्थ, 93 टक्के नागरिक जागरूक आहेत आणि 59 टक्के लोकांना हा काळजीचा मुद्दा वाटतो. केवळ 24 टक्के सजग, सावध आहेत आणि फक्त एक टक्का पूर्णपणे अलिप्त आहेत. त्यांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाची मोठी किंवा मध्यम प्रमाणात हानी होऊ शकते.
 
 
चारही खंडातील बहुतेक लोकांनी पावसासह स्थानिक हवामानात बदल झालेले पाहिले आहेत, असे क्वीन्सलँड विद्यापीठातील प्रकल्पाचे सह-प्रमुख डॉ. जगदीश ठकार यांचे म्हणणे आहे. विविध भारतीय लोकसंख्येत (Global Warming) ग्लोबल वॉर्मिंग सामाजिक आणि आर्थिक असमानता कशी वाढवते, हेदेखील अहवालात अधोरेखित केले आहे. भारतीय जनतेचा संदेश स्पष्ट आहे. सर्व प्रकारचे भारतीय हवामान बदलाबद्दल चिंतित आहेत. ते हवामान धोरणांचे समर्थन करतात आणि त्यांना त्यांच्या सरकारांकडून नेतृत्व हवे आहे, असे सी व्होटर इंटरनॅशनलचे संस्थापक आणि संचालक यशवंत देशमुख यांनी सांगितले.