वारी पंढरीची
प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ।
देखिलेंगे माये पंढरिपाटणीं । पुंडलिका आंगणी विठ्ठलराज ॥
विज्ञानेंसी तेज सज्ञानेसी निज । निर्गुणेंसी चोज केलें सयें ।
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल । निवृत्तीनें चोखाळ दाखविलें ॥
आदिशक्तीचा अवतार असलेल्या (Saint Muktai Palkhi) संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इ. स. 1279 साली झाला. त्या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई ‘मुक्ताई’ या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत, या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला. मातापित्याच्या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. आपल्या भावंडांची जणू ती माउलीच झाली.
महाराष्ट्रातील इतर संतांच्या पालखीप्रमाणे (Saint Muktai Palkhi) संत मुक्ताईच्या आषाढी पायीवारीला 312 वर्षांची परंपरा व मानाचे स्थान आहे; कारण मुक्ताईची पालखी आल्याशिवाय इतर संतांच्या पालखीला पंढरपुरात प्रवेश मिळत नाही. दरवर्षी हा सोहळा वैशाख शुद्ध पंचमीला कोथळी (मुक्ताईनगर) येथून निघतो. पुढे 34 दिवसांत सहा जिल्ह्यांतून 750 किमी पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल होतो; पण या पारंपरिक मार्गात पालखीला अनेक वेळा मुख्यमार्ग (महामार्ग) सोडून आडमार्गाने फेर्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुक्कामाची सं‘या म्हणजेच प्रवासाचे दिवस वाढतात. शिवाय ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे अनेकदा पायी दिंडी वेगळी व रथ पालखीचा मार्ग वेगवेगळा होतो. परंतु, यावर्षी पालखी मार्गात बदल झाल्याने आडमार्गाने व फेर्याचा प्रवास टळणार आहे. त्यामुळे 34 दिवसांचा होणारा प्रवास यावर्षी केवळ 24 दिवसांचा होणार आहे.
आता वारीत सहभागी सुमारे अडीच हजार वारकरी मंडळींना 150 किमीचा प्रवास कमी करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण प्रवास महामार्गानेच होणार आहे. (Saint Muktai Palkhi) पालखी कुठेही रथाच्या खाली व रथ महामार्गाच्या खाली उतरणार नाही, हे महत्त्वाचे. या नवीन मार्गामुळे संत मुक्ताईचा पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी म्हणजेच अष्टमीला पंढरपुरात डेरेदाखल होईल.
- संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष, विश्व वारकरी सेवा संस्था, नागपूर