तभा वृत्तसेवा
भंडारा,
वरठी हे भंडारा जिल्हयातील मोठे व महत्त्वाचे ठिकाण असून (Varathi Bus Station) वरठी येथून दररोज 500 हून अधिक विद्यार्थी व नागरिक शिक्षण व इतर कामासाठी बसने प्रवास करतात. मात्र प्रवास करीत असलेल्या विद्यार्थ्यांना येथील बस स्थानकातील पास डेपो बंद असल्याने कमालीचा त्रास होत असून तो सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन अभाविपच्या वतीने देण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून येथील एस.टी. महामंडळाच्या बस स्थानकातील पास डेपो बंद आहे. पास डेपो बंद असल्याने अन्य ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना किंवा सामान्य प्रवाशांना पास काढावी लागते. यामुळे नाहक मानसिक त्रास होत आहे. (Varathi Bus Station) पास डेपो बंद असल्याने प्रवाशांची वर्दळ कमी झाली. परिणामी स्थानक परिसरात अस्वच्छता पसरली आहे. अस्वच्छता असल्याने प्रवाशांना आजुबाजूला असलेल्या झाडाच्या सावलीचा आसरा घेऊन उन्हात उभे राहावे लागते. या सर्व परिस्थितीचा विचार करुन येथील पास डेपो सुरु करावा व परिसराची स्वच्छता करावी, या मागणीचे निवेदन विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यांना देण्यात आले आहे. अभाविपचे छात्रशक्ती संयोजक रुपेश सपाटे निवेदन देत या समस्ये विषयी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली आहे.