अलंकापुरी ते भूवैकुंठ पंढरी : वारी पंढरीची

    दिनांक :27-Jun-2023
Total Views |
वारी पंढरीची
लाखो भाविकांना सोबत घेऊन आळंदीतून विश्वमाउली, Wari Pandhari अनाथांची माय-योग्यांची माउली, साधकांचे मायबाप आणि ज्ञानियांची आई अर्थात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने शेवटच्या टप्प्यावर आहे. माउलींची पालखी ज्या ज्या गावातून जाते त्या त्या गावाच्या नावाचा अर्थ श्री रत्नेश्वर संस्थान टोकवाडी परळीचे हभप तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांनी आपल्या शब्दातून खूपच सुंदर मांडलेला आहे.
 
 
 
27jun-wari-photo
 
आळंदी शब्दाचा अर्थ आनंदी असा केला तर खरोखरच आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानियांचा राजा पालखीत बसून थाटामाटात आळंदीची प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि आजोळ घरी विश्रांतीसाठी पोहोचतो. नवमीच्या प्रसन्न सकाळी पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने प्रस्थान करतो. पुणे अर्थात पुण्यनगरी... माउलींच्या सहवासात पुण्याची कमाई करत करत Wari Pandhari वारकरी पुण्यनगरीत दाखल होतात. पुण्याची शिदोरी पदरात बांधण्यासाठी दशमीचा मुक्काम वारकरी पुण्यनगरीतच करतात.
 
 
एकादशीला दिवे घाटाचे दिव्य पार करून पालखी सोहळा सासवडच्या निरामय वातावरणात दाखल होतो. सासवड म्हणजे एकांतवासी सोपानकाकांची नगरी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व धाकटे बंधू सोपान काकांच्या बंधुभेटीचा नयनरम्य सोहळा वारकर्‍यांना अनुभवता येतो. सासवडच्या एकांतवासातून पुढे प्रवासाला निघालो की शंकराचेच रूप असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत प्रवेश होतो. पिवळ्या भंडार्‍याची उधळण म्हणजे भक्तीचा परमोच्च आनंद. तो आनंद घेत घेत वारकरी वाल्ह्याच्या तपोभूमीमध्ये प्रवेश करतात.
 
 
वाल्हा म्हणजे वाल्या कोळ्याचा वाल्मीकि ऋषी बनवणारी तपोभूमी. जगाच्या मायबापाला भेटण्यासाठी तपोभूमीतून तर जावेच लागेल ना! तप करून तप्त झालेल्या वारकर्‍यांना नीरा स्नानाने शांती प्राप्त होते. नीरा स्नान करून माउली लोणंद मुक्कामी पुन्हा सर्वांचा आनंद द्विगुणीत करते. दोन दिवस लोणंदचा आनंद घेऊन सोहळा तरडगावच्या दिशेने निघतो. वाटेत पहिले उभे रिंगण पार पडते. घोडा म्हणजे आपल्या मनासारखा चंचल आहे. त्या घोड्याला जसे उभ्या रिंगणामध्ये सरळ रेषेत धावावे लागते, तसेच मनालासुद्धा सरळ रेषेत आणण्यासाठी उभे रिंगण असते. उभ्या रिंगणाने सरळ झालेले मन तरडगाव म्हणजे सरळगाव असलेल्या मुक्कामाला पोहोचते.
 
 
Wari Pandhari एकदा मन सरळ झाले की, इंद्रियांची पलटण कोणताही त्रास देत नाही. म्हणूनच तर इंद्रिये एकाजागी स्थिर करण्यासाठी फलटणचा मुक्काम आहे. इंद्रियांची पलटण ताब्यात घेऊन बरड म्हणजे आशाळभूत लालाईत श्री विठ्ठल दर्शनाची तीव‘ इच्छा मनात ठेवून सोहळा बरड गावी मुक्कामाला पोहोचतो. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची तीव‘ आस निर्माण झाली की, देवाशी आपोआप नाते जोडले जाते. देवाशी नाते जोडून सदाशिवाच्या संगतीने, पहिले गोल रिंगण करायला पालखी सदाशिव नगरला येते. गोल रिंगणामध्ये आनंदाच्या माळा तयार करून त्या शिरी धारण करण्याकरिता भाविक वारकरी माळशिरस मुक्कामी पोहोचतात. सलग दोन दिवस इंद्रिय परमात्माभोवती गोल गोल फिरली की पंढरपूरला जायची वेळ जवळ आली, असे संकेत देणारे वेळापूर मुक्कामासाठी समोर येते.
 
 
वेळापुरातून बंधुभेटीच्या ओढीने पुन्हा एकदा गोल रिंगण साजरे करून सेवावृत्ती असलेल्या भंडी शेगाव मुक्कामी पालखी पोहोचते. बंधुभेट आनंद सोहळा डोळ्यात साठवून भाविक शेगावी विसावतात. एवढ्या दिवसांच्या प्रवासात खरी सेवा घडते. मग भगवंतालासुद्धा आपल्या पाठीवर हात टाकून ‘व्वा! खरी सेवा केली’ असे म्हणावे वाटते. वाखरीचा आनंद सोहळा आटोपून दशमीच्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम पाल‘या पंढरीत पोहोचतात आणि सरतेशेवटी विश्वमाउली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीत दाखल होते. अशी एकरूपता देणारी, समरूपता देणारी, देहभान विसरायला लावणारी Wari Pandhari पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी घडलीच पाहिजे.
संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष, विश्व वारकरी सेवा संस्था, नागपूर