घरोघरी होणार वाघाट्याची भाजी

दुर्मिळ झाला वाघाटीचा वेल

    दिनांक :29-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चिखलदरा, 
वाघाटी हे फळ (Vaghati Vegetable) आषाढी एकादशीसाठी महत्त्वाचे मानले जाते. एकादशीचा उपवास सोडण्यासाठी द्वादशीला याचा वापर केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशी आणि वाघाटी यांच्या नात्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही.
 
Vaghati Vegetable
 
आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ताटात वाढल्या जाणार्‍या (Vaghati Vegetable) वाघाटीच्या भाजीचे वाघाटी हे फळ आता काळाच्या ओघात नामाशेष होत चालले आहे. शेताच्या बांध, परसबागेतील झाडावरील वाघाटीचे वेल आता सिमेंटच्या जंगलात दुर्मिळ झाले आहे. सध्या ग्रामीण भागात वाघाटीचा दर हा 100 ते 200 रुपये किलो आहे. आषाढी एकादशी उजाडली की, उपवास धरणार्‍या वारकर्‍यांना वाघाटीच्या (गोविंद फळ) हिरव्याकंच फळांचे वेध लागतात. उपवास सोडताना ही भाजी खाण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत ही फळे तयार होतात. नंतर ती तोडून बाजारात विक्रीस आणली जातात. परंतु अलीकडे तर वाढत्या वृक्षतोडीमुळे वाघाटी या फळाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे.
 
 
पांदण, ओढ्याच्या काठावर असणार्‍या दाट झाडीत वाघाटीचे वेल फुलतात. इतर झाडावर वाढणार्‍या (Vaghati Vegetable) वाघाटीच्या झळकट काटेरी वेलाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे वाघाटीचा वेल पुढील येणार्‍या पिढीला माहिती व्हावा, आषाढी एकादशीनिमित्त त्याचे महत्व टिकावे आणि निसर्गातील अन्नसाखळी अबाधित राहावी, याकरिता वाघाटीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हा वेल आयुर्वेदिकदृष्ट्याही तितकाच महत्वाचा आहे, तर फुलपाखरांच्या जीवनचक्रातही वाघाटी महत्त्वाची आहे. या फळाचा भाजी प्रकारात समावेश होत असला तरी वाघाटीचा वेल रुजवणे त्यांचे संवर्धन करणे, त्यापासून फळांचे उत्पन्न घेणे शक्य नाही. हा वेल नैसर्गिकरीत्या गर्द झाडीत वाढतो. आषाढी एकादशी आली की, मगच सर्वांना वाघाटीची आठवण येते. आताच्या नवीन पिढीला तर या वाघाटीविषयी फारशी माहिती नाही.
 
 
आयुर्वेदिक महत्त्व
वर्षातून एकदा आषाढी एकादशीला हे फळ खाण्यामागे आयुर्वेदाचा विचार केला आहे. (Vaghati Vegetable) श्वास घेताना छाती व पोटात जळजळणे, डोके आणि चेहर्‍यावरील चेतापेशीत तीव्र वेदना होणे, लहान मुलांमध्ये वार्‍यांमुळे निर्माण होणारी पोटदुखी, शरीराच्या कोणत्याही भागात कंप सुटणे व दुखणे, विषारी द्रव्य पोटात गेल्यानंतर मळमळणे, ताप उतरवणे, हगवण लागणे, शरीराच्या विशिष्ट भागात सूज आल्यानंतर, सर्दी, खोकला, अनेक विषाणूजन्य आजार, याच बरोबर अनेक प्रजातींच्या कृमीचा नाश होण्यासाठी वाघाटीची फळे, पाने व मुळे यांचा वापर केला जातो.