तभा वृत्तसेवा
नांदगाव खंडेश्वर,
Gharkul Yojana : 2022 पर्यंत एकही लाभार्थी घरकूल योजनेपासून वंचित राहणार नाही, हे सरकारचे आश्वासन खोटे ठरले व ते 2024 पर्यंत ढकलण्यात आले. मात्र 2024 हे वर्ष केवळ 8 महिन्यांवर येऊन ठेपले असता, अंजनगाव बारी गावात योजना सुरू झाल्यापासून आजतागायत केवळ 60 टक्के लोकांनाच घरकूल मिळाले आहे. या योजनेपासून अद्यापही 40 टक्के लाभार्थी वंचित आहेत. यामध्ये ‘ ड’ गटातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश असून या भागात घरकुल योजनेला पूर्णपणे स्थगिती असल्याचे संबंधित कर्मचार्यांकडून सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहता या परिसरात असलेल्या गावांमध्ये ही योजना सर्वत्र सुरळीतपणे सुरू असून तेथील ग्रामपंचायती 2024 पर्यंत नक्कीच आपले घरकूल वाटपासंबंधीचे ध्येय गाठेल, यात शंका नाही.

घरकूल योजनेसंबंधी (Gharkul Yojana) वंचित लाभार्थ्यांची नावे पंचायत समितीला पाठवावी लागतात. त्यानुसार पंचायत समितीमधून येणार्या यादीनुसार घरकूल वाटप करावे लागते. याठिकाणी मात्र ‘ड’ गटातील लाभार्थ्यांची नावे यादीत असूनही कित्येक वर्षापासून त्यांना या योजनेचा लाभ नाही. यामध्ये बर्याच कुटुंबियाची घरे कौलारू, मातीत बांधलेली व पडकी आहेत. यासंबंधी लाभार्थ्यांना विचारले असता, पंचायत समितीमधून येणार्या यादीत फेरबदल केला जात असल्याचे सांगितले.
जवळपासच्या गावांमध्ये घरकुलांचे बांधकाम सुरू असून काही नागरिकांचे पूर्ण झाले तर काही जणांना दुसरा व तिसरा टप्पा मिळालाच नाही. हा निधी का अडकवून ठेवण्यात आला, हे समजायला काही मार्ग नाही. अंजनगाव बारी गावात जवळपास 30 टक्के घरे मातीची असून अद्यापही त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही व 10 टक्के घरे पडकी आहे. काही कुंटुबियाची यादीत नावेही नाहीत. गटविकास अधिकार्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आता मात्र संबंधित प्रशासनाने परिसराची पाहणी करुन पडकी घरे असलेल्या लाभार्थ्यांना सर्वप्रथम घरकूल द्यावे, तसेच वंचित लाभार्थ्यांचाही यादीत समावेश करून 100 टक्के घरकूल योजनेचे आपले आश्वासन 2024 पर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (Gharkul Yojana)