तभा वृत्तसेवा
शिरखेड,
Dry trees : अमरावती - मोर्शी महामार्गाचे काम पूर्ण होऊन 5 वर्ष झाले. मात्र, अजूनही या मार्गाच्या दुतर्फा असलेली वाळलेली झाडे तोडण्यात आलेली नाही. ही झाडे अपघाताला निमंत्रण देत आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वी अपघाताची एक घटना घडली आहे.

सदर मार्गावरची ही झाडे नुसतीच वाळलेली नाही तर हळूहळू जीर्ण होत चालली आहेत. या (Dry trees) झाडांमुळे एखादा मोठा अपघात होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही झाडे लवकर तोडण्यात यावी अशी वाहन चालकांची मागणी आहेत. 27 मार्च 2022 रोजी अकोली, अमरावती येथे राहणार्या वर्षा महल्ले दुचाकीवरून जात असताना करजगाव फाट्यावर वाळलेले झाड त्यांच्या गाडीवर पडले होते. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य दोन गंभीर जखमी झाले होते. या घटनेला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनपर्यंत वाळलेली झाडे तोडलेली नाही. संबंधित विभाग आणखी किती लोकांच्या मृत्यूची वाट बघतंय असा प्रश्न निर्माण झाला. सदर मार्गावर 30 ते 35 फूट उंचीची जवळपास वाळलेली 200 झाड आहे. कोणत्याही क्षणी महामार्गावरील ये - जा करणार्या वाहनावर ती पडू शकते. पावसाळ्याचा दिवसात ती शक्यता जास्त आहे.