नागपूर,
कळमेश्वर तालुक्यातील गोवरी येथील (Chandrabhaga river) चंद्रभागा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्या असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. यावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात राज्य सरकारला माहिती घेण्याचे निर्देश दिले. अॅड. अरविंद वाघमारे यांनी हा पुल तातडीने बांधला जावा यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिकेनुसार, सुरुवातीला गोवरी येथे केवळ अडीच फुट उंचीचा पुल होता. (Chandrabhaga river) पावसाळ्यात हा पुल नेहमीच पाण्याखाली राहत होता. या पुलामुळे सहा व्यक्तींचा मृत्यूही झाला होता. परिणामी, जुना पुल पाडण्यात आला, पण नवीन पुलाचे बांधकाम थंडबस्त्यात गेले होते. करिता, कळमेश्वर, खैरी, पारडी, गोवरी, तोंडाखैरी, सिल्लौरी, बेलोरी, सेलू, परसोडी, बोरगाव, झुनकी, वाकीचे इत्यादी गावांतील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. ही याचिका प्रलंबित असताना पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.
तसेच, पुल वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. दरम्यान, वाघमारे यांनी याचिकेत (Chandrabhaga river) दुरुस्ती करून पुलाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला व याची चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकरणी बुधवारी न्या. अतुल चांदूरकर व न्या. वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत राज्य सरकारला यासंदर्भात माहिती घेण्याचे निर्देश दिले. याचिकाकत्यातर्फे अॅड. अरविंद वाघमारे यांनी स्वतः बाजू मांडली.