तभा वृत्तसेवा
अमरावती,
Swachhta Shramdan : देशभरात15 सप्टेंबर ते 2 आक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छताही सेवा’ पंधरवडा राबविण्यात येत असून, या पंधरवडयाचे लक्ष्य हे कचरामुक्त भारत करणे हे आहे. या पंधरवड्यामध्ये देशातील सर्व शहरांमध्ये तसेच गावांमध्ये स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. 17 सप्टेंबर रोजी देशभरात लाखो लोकांनी स्वच्छता श्रमदान केले आहे. अमरावती जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा हजारो ग्रामस्थांनी स्वच्छता श्रमदान केले असून, या मध्ये 721 गावे ही कचरामुक्त करण्यात आली. (Swachhta Shramdan) अमरावती जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षातील कर्मचार्यांनी सुद्धा कार्यालय परिसर स्वच्छ करून स्वच्छता श्रमदान केले.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या हस्ते या (Swachhta Shramdan) पंधरवड्याचे उद्घाटन करून स्वच्छतेची शपथ सुद्धा घेण्यात आली. बर्याच ग्रामपंचायतीमध्ये खासदार व आमदार यांनी स्वत: उपस्थित राहून शपथ कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या पंधरवड्यात घ्यावयाच्या विविध उपक्रमापैकी रविवारचा स्वच्छता श्रमदान हा एक प्रमुख उपक्रम होता. जिल्ह्यातील सर्व 841 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता श्रमदान करून जवळपास 721 गावे कचरामुक्त करण्यात आली. यामध्ये कचर्याची पारंपरिक ठिकाणे नष्ट करून त्याचे सौदर्यीकरण करणे, प्लॅस्टिकमुक्त गाव करणे, सार्वजनिक परिसर स्वच्छ करणे, विविध कार्यालये, धार्मिक स्थळे, नदीचा परिसर, उद्याने, ऐतिहासिक स्थळे, बसस्टॉप आदी कचरामुक्त करण्यात आले व तेथे सौंदर्यीकरण करण्यात आले.
वृक्षलागवड सुद्धा करण्यात आली. (Swachhta Shramdan) जिल्हा परिषद अमरावती कार्यालय परिसरात स्वच्छता श्रमदान करून संपूर्ण 14 विभागाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, प्रशांत सातव, सुनील इंगोले, नीलिमा इंगळे, दर्शना गौतम, धनंजय तिरमारे, प्रीती बावणे, दिनेश गाडगे, प्रदीप बद्रे, संजय राजुरकर यांच्यासह इतर अनेक कर्मचारी उपस्थित होते.