तभा वृत्तसेवा
अमरावती,
खासदार व आमदार असलेल्या Rana Family राणा दाम्पत्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभय असल्यामुळेच ते बेताल बडबड करून जिल्ह्यातल्या वातावरण दुषित करीत असल्याचा थेट आरोप अमरावती शहर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सोमवारी केला. राणा दाम्पत्याने गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या नेत्या आ. यशोमती ठाकूर व आ. बळवंत वानखडे यांच्यावर टिका केली होती. त्या टिकेला सदर नेत्यांनी उत्तर दिल्यानंतर शहर काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याचा तीव्र शब्दात निषेध केला. आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या आ. वानखडे यांच्यावर आ. राणा यांनी केलेली टिका म्हणजे, त्या चळवळीचा अपमान आहे.
कारण नसताना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणे योग्य नाही. Rana Family जनता त्यांना याचा जाब निश्चित विचारेल असा विश्वास व्यक्त करून कायदेशीर कारवाईची शक्याताही काँग्रेसने बोलून दाखविली. यशोमती ठाकूर यांनी निवडणुकीच्या वेळी पैसे घेतल्याचे राणा दाम्पत्याचे म्हणने असेल तर चार वर्षापासून त्यांचे तोंड का बंद होते, आता उघडलेच आहे तर त्यांनी पुरावे द्यावे. यशोमती ठाकूर यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली असून अब्रुनुकसानीचा दावा त्या ठोणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षात विकासाचे ठोस असे एकही काम मार्गी न लावणार्या राणा दाम्पत्याला बेछुट आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा नवा रोग लागला आहे.
खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचे त्यांचे नेहमीचे प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. सांगण्यासारखे काही नसल्यामुळे दहीहंडीच्या नावावर नट व नट्यांना नाचवून माहोल करण्याचा त्यांचा प्रयत्न दरवर्षी असतो. यंदा मात्र त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी या Rana Family दाम्पत्याने आरोपांचा धुराळ उडविला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोरावर हे दाम्पत्य उड्यामारत आहे. सत्तेची ही नशा जास्त दिवस चालणार नाही. येणार्या निवडणुकीत या दाम्पत्याला जनता निश्चितच घरी बसवणार आहे. यापुढे बिनबुडाचे आरोप राणा दाम्पत्याने केल्यास ते खपवून घेतल्या जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश प्रवक्ता मिलिंद चिमोटे, अॅड. दिलीप एडतकर, हरिभाऊ मोहोड, विलास इंगोले, किशोर बोरकर, भय्या पवार यांच्यासह अन्य हजर होते.