वाशीम,
Meri Mati Mera Desh आझादी का अमृत महोत्सव व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अमृत महोत्सव कार्यक्रमाबाबत मेरी माटी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार गाव ते शहरापर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होणे अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक गावाचा एक अमृत कलश तयार करण्यासाठी प्रत्येक घरातून माती गोळा करून ज्या कुटुंबाकडे शेती आहे,

त्यांच्या शेतातील एक मुठ माती जमा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे माती उपलब्ध नाही अशा कुटुंबाकडून एक चिमुटभर तांदूळ त्या मातीच्या कलशामध्ये जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.Meri Mati Mera Desh या अभियानाची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. नागरिकांनी भव्य उत्सवी स्वरूपाच्या वातावरणात ढोल, ताशे अशी काही वाद्ये वाजवित माती संकलित करावी. ग्रामीण क्षेत्रात माती किंवा तांदूळ स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, पंचायतचे कर्मचारी, राज्य शासनाचे कर्मचारी, स्वयंसेवक इत्यादी संकलन करतील तसेच शहरी क्षेत्रात स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, नगर परिषद, नगर पंचायत, मनपा कर्मचारी व स्वयंसेवक हे संकलन करतील. महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्राचे मंडळ, भारत स्काऊट गाईड्स, अंगणवाडी कर्मचारी आणि इतर युवक स्वयंसेवक विशेषतः महिलांचा सहभाग यांच्या सक्रीय सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात येणार आहे. प्रत्येक घरातून गोळा केलेल्या मातीचा कलश केल्यानंतर उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर तयार केलेल्या अमृतवाटिकेकरीता करता येऊ शकतो. गावामध्ये माती तांदूळ संकलनाच्या वेळी पंचप्राण प्रतिज्ञा घेण्याबाबत नियोजन करावे. असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.