तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Nana Patole आघाडीमध्ये आता काँगे्रस पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. तसे आधीही काँगे्रस मोठाच भाऊ होता. पण कुणी मानत नव्हते. आता आघाडीतील दोन्ही पक्षांची शकले पडल्याने काँगे्रस अधिकृतपणे मोठा भाऊ सिध्द झाला आहे. काँगे्रसच आता आघाडीचे नेतृत्व करणार आहे, असे सुतोवाच काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केले.सध्या काँगे्रसची विदर्भात जनसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त नाना पटोले चंद्रपुरात आले होते. मंगळवारी दिवसभर विविध वॉर्डांत फिरल्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत पटोले बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष (महानगर) रामू तिवारी, दिनेश चोखारे प्रभृती उपस्थित होते.

एका प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले म्हणाले, आघाडीमध्ये काँगे्रस मोठाच भाऊ आहे. आधीही होता. आता मात्र आम्हीच या आघाडीचे नेतृत्त्व करू. काँगे्रसने आता कंबर कसली आहे.Nana Patole जनसंवाद यात्रेतून आम्ही लोकांना धीर देण्याचे काम करीत आहोत. कारण जनता विद्यमान सरकारला कंटाळली आहे. जनभावनेला चिरडून टाकण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप या सरकारने दिलेली नाही. धान उत्पादकांना बोनस देण्यात आला नाही. आता काँगे्रसच जनतेला न्याय देणार आहे. केवळ टिका न करता आम्ही येत्या काळात काय करू याबाबतची भूमिकाही आम्ही या यात्रेतून जनतेपुढे मांडतो आहोत, असेही ते म्हणाले.लाढीहल्ला करणारे सरकारला हे मायबाप सरकार असूच शकत नाही. सरकार चुकले म्हणून त्यांनी या लाढीहल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियेचे गुन्हे परत घेतले, असा टोमणाही पटोले यांनी लगावला.
आरक्षणाचे गाजर भाजपाला भोवले
धनगर आणि मराठ्यांना 24 तासात आरक्षण देण्याचे गाजर भाजपाला आता भोवत आहे. मागील पाच वर्षात या भाजपाप्रणित सरकारला या विषयात काहीच करता आले नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.