प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित Chitrarath-Shivaji Maharaj चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तेलंगण राज्याच्या सीमेवर जिल्ह्यातील पाटणबोरीच्या यशवंत एनगुर्तीवार व सहकारी कलावंतांनी या चित्ररथातील शिल्प साकारले आहे. यशवंतची चित्ररथ साकारण्याची ही पाचवी वेळ आहे. चित्ररथ साकारणार्या कलावंतांमध्ये एकूण 30 कलावंतांचा सहभाग असून त्यात यवतमाळ जिल्ह्यामधील कलावंतांचा मोठा वाटा आहे. तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) यांनी चित्ररथाचे कलादिग्दर्शन सांभाळले आहे. तर श्रीपाद भोंगाडे (हिंगणघाट) हस्तकला विभागाचा प्रमुख आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार शिल्पकला विभागाचा प्रमुख आहे. त्याच्या समूहामध्ये भूषण हजारे (कळंब), सूरज गाऊत्रे (सोनबर्डी), पिंटू भोंग (पहापळ), नितेश बावणे (घाटंजी), अक्षय बावणे, योगेश वहिले, अविनाश बावणे, निखिल दुर्षेट्टीवार, अरुण मेश्राम, सुमीत कानके (सर्व पाटणबोरी) इत्यादी शिल्पकारांचा समावेश आहे. या चित्ररथाद्वारे यवतमाळकरांतर्फे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात येणार असल्याची त्यांची भावना आहे. जिल्ह्यातील कलावंतांनी तेलंगणच्या सीमेवर असलेल्या पाटणबोरी येथे यशवंत यांच्या स्टुडिओमध्ये या चित्ररथातील शिल्प साकारले आहे. 15 जानेवारीला दिल्लीत हे शिल्प पोचले असून उर्वरीत काम दिल्लीत पार पडले आहे. नृत्य, संगीत व पोशाखासह कर्तव्यपथावर मंगळवारी तालीम पार पडली. या माध्यमातून जिल्ह्यातील कलावंतांनी साकारलेल्या चित्ररथाची पहिली झलक संपूर्ण देशाला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रासह छत्तीसगड राज्याचा (बस्तरचा मुरिया दरबार) चित्ररथ साकारण्याची जबाबदारी देखील याच कलावंतांना मिळाली आहे.