पाठेळ करितां न साहावे वारा।साहेलिया ढोरा गोणी चाले॥

    दिनांक :07-Jan-2024
Total Views |
तुका आकाशाएवढा
Saint Tukaram Maharaj : एखाद्या कामाच्या पूर्ततेच्या यशस्वीतेकरिता खूप प्रयत्न करावे लागतात. याकरिता दीर्घ अनुभवाची किंवा प्रशिक्षण म्हणजेच त्या कार्याविषयीची परिपूर्ण माहिती असलेल्याची नितांत आवश्यकता भासते. जीवनाच्या प्रवासात माणसानं जे जे काही मानवी जीवनोपयोगी चांगलं असेल ते शिकून घेतलं पाहिजे तसेच दु:ख पचविण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी असणं जरूरी आहे. तेव्हा कुठं तो आपल्या कार्यात परिपक्व होऊ शकतो तसेच प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा खंबीर होता आले पाहिजे. म्हणून ते कार्य पार पाडण्याकरिता जोपर्यंत त्या कामाच्या बाबतीत तो प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत ते कार्य त्यांच्याकडून करून घेणे अवघड जात असते. तसेच त्यांची त्या कार्य करण्याबाबत सकारात्मक मानसिकता तयार करावी लागते. जसे देशाचे संरक्षण करण्याकरिता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सैनिक लढत असतात व यश संपादन करतात. कारण त्यांना आधी शस्त्रांबद्दलची माहिती दिली जाते.
 
 
Saint Tukaram Maharaj
 
अंगात प्रचंड शक्ती असूनही ते ऐकण्याच्या मानसिकतेत असल्याने शस्त्र चालविण्यात निष्णात होतात. अनुभवाच्या आधारावर अपेक्षित कार्य पूर्ण करून शत्रूवर विजय मिळवतात. म्हणूनच पाहिजे तसे कार्य पूर्ण होण्यासाठी अनुभव महत्त्वाचा ठरत असतो. सुरुवातीला थोडा त्रास सहन करीत त्याला ते कार्य कशा पद्धतीने करावे या संदर्भात परिपूर्ण अशी माहिती घ्यावीच लागते. त्या कार्यासंबंधी असलेल्या अडचणीबाबत त्याला माहिती दिल्यास तो त्या अडचणीला सामोरे जाऊन ती अडचण कशा प्रकारे सोडवावी, याबाबतचे कौशल्य ज्ञात असल्यामुळे तो ते कार्य चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. त्याचं व्यक्तिमत्त्व परिपक्व बनल्यामुळे कठीण कार्य सहजपणे करू शकतो.
 
 
याकरिता अप्रशिक्षित किंवा अनुभवशून्य माणसांनी सुरुवातीला होणार्‍या अडचणी कशा प्रकारे निर्माण झाल्या व त्या कशा सोडवाव्या या द़ृष्टीने मार्गदर्शन जगद्गुरू Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी आपल्या रोजच्या पाहण्यातील उदाहरण देऊन प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून सकारात्मक दिशा दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे उदाहरण स्पष्ट करण्याकरिता त्यांनी शेतीच्या संदर्भातील कार्यात नवशिक्या बैलाचे उदाहरण देऊन आपला विचार स्पष्ट केला आहे. जनावरे माणसाळल्यानंतर त्यांच्याकडून मग कठीणातले कठीण, कितीही जड असणारे कोणतेही कार्य चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकते. हे उत्तमरीत्या त्यांनी साध्या सोपे पद्धतीने मांडले आहे. ते म्हणतात की,
 
पाठेळ करितां न साहावे वारा।
साहेलिया ढोरा गोणी चाले॥
आपणां आपण हे चि कसवटी।
हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें॥
नवनीत तोंवरी कडकडी लोणी।
निश्चळ होऊनी राहे मग॥
तुका म्हणे जरी जग टाकी घाया।
त्याच्या पडे पायां जन मग॥ अ. क्र. 2297
शेती करण्याच्या द़ृष्टिकोनातून शेतकर्‍यांना बैलांचा आधार घेऊन अनेक कामे करावी लागतात. कारण नांगरणी, वखरणी, डवरणी, पेरणी, जड मालाची वाहतूक यासारखे असे जड व कठीण काम तेच करू शकतात. त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. म्हणूनच त्यांच्याशिवाय ते पूर्ण होऊच शकत नाही. अशा या पाठीवर ओझे वाहणार्‍या जनावराकडून सुरुवातीला काम करून घेणे हे अत्यंत कठीण असते. त्यांच्या खांद्यावर सुरुवातीला ते जू ठेवू देत नाही; अर्थात ते सहन करीत नाही. अंगात प्रचंड शक्ती असल्यामुळे ते एका जागी थांबायलाही तयार नसतात. एवढंच काय, त्यांच्या पाठीवरून जर का जोरानं सुटलेली हवा जरी गेली तरी ते त्या हवेचा स्पर्श सहन करत नाहीत. एवढा बेफामपणा त्यांच्यामध्ये असतोे.
 
 
Saint Tukaram Maharaj : असाच स्वभाव सुरुवातीला तरुण तसेच अनुभव नसलेल्यांचा असतो. ते काहीच ऐकायला तयार नसतात. ते उन्मत्त होतात. ते अनियंत्रित असतात. असाच अनुभव सुरुवातीला येतो. परंतु पुढे मात्र यांना जर का नीट वळण लावलं आणि ती का माणसाळली तर ते त्यांच्या पाठीवर मालाने भरलेली वजनदार गोणी न कुरकुरता, कुठलाही त्रास न देता पाहिजे त्या ठिकाणापर्यंत वाहून नेतात. कुठलाही प्रतिकार ते करत नाहीत. आधीची वागणूक व माणसाळल्यानंतरची वागणूक बघितल्यास जमीन-आसमानमध्ये असलेला फरक आपणास जाणवतो. नवीन असलेला गोर्‍हा सुरुवातीला जर का जुंपण्याचा प्रयत्न केल्यास तो त्याच्या मानेवर जू ठेवू देत नाही. तरीही त्याच्या खांद्यावर जू ठेवून गाड्याला जुंपले असता तो आपल्या ताकदीच्या जोरावर सोबतच्या बैलाची फरफड करताना दिसतो. त्याला वाटेल तिकडे तो ओढण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी शेतकर्‍याला त्याला आवर घालणे कठीण होऊन बसते. कारण तो बेफामपणे ओढत असतो. तो उन्मत्त होऊन ओढत असताना मग अपघातही होऊ शकतो. नाही त्या प्रसंगाला सामोरे जावं लागतं. परंतु पुढे पुढे मात्र त्याच जनावराला हळूहळू त्या कामाचा सराव होऊन पाठीवर ठेवलेले ओझे पाहिजे त्या ठिकाणापर्यंत तो व्यवस्थितपणे सुरक्षित घेऊन जातो. मानेवर जू ठेवल्याने पडलेले घट्टे त्याला परिचित झाल्याने शेतकर्‍याला तो आता निवांतपणे कुठलाही उन्मत्तपणा न करता जू ठेवू देत रस्त्याने चाकोरी न सोडता तो चालत असतो. हा अनुभव प्रत्येक शेतकर्‍याने घेतलेला असतो.
 
 
याच उदाहरणाचा आधार घेत Saint Tukaram Maharaj महाराज म्हणतात की, ऐन उमेदीच्या काळात किंवा तारुण्यात आलेल्यामध्ये अत्यंत उताविळपणा दिसून येतो. ते काही ऐकायला तयारच नसतात. काय बरोबर काय चूक हे समजूनही घेण्याची त्यांची अजिबात मानसिकता नसते. मार्गदर्शन न घेतल्यामुळे ते आपलं खूप मोठं नुकसान करून घेताना दिसतात. ही गोष्ट टाळण्यासाठी त्याने त्याच्या अशा या वृत्तीत बदल केला पाहिजे आणि ऐकण्याची मानसिकता ठेवल्यास व उन्मत्तपणा सोडल्यास आपलं जीवन यशस्वी करू शकतो. काही नियम त्यांनी स्वत:हून लावून घेतले पाहिजे. तसेच काही कसोट्या लावून जीवन समृद्ध करायला पाहिजे. आपल्या मनात असणार्‍या अनेक हर्ष, क्रोधावर ताबा मिळवून विकारांना आहे तसेच वीरू द्यावे. सकारात्मक विचार करून पाऊल पुढे टाकणे अत्यंत जरूरीच असते. थोडक्यात स्वत:वर नियंत्रण ठेवावयास पाहिजे. संयम ठेवून योग्य वळण लावावयास पाहिजे.
 
 
परिपक्वतेबाबत स्पष्ट करताना महाराज म्हणतात की, लोणी जोपर्यंत पूर्णपणे तापवत नाही तोपर्यंत चांगल्या दर्जाचे तूप निर्माण होत नाही. लोण्यामधील अनावश्यक घटक जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याचं साजूक तुपात रूपांतर होत नाही. म्हणून लोण्याला कडकड होईपर्यंत तापविणे गरजेचे असते. त्यातील कच्चेपणा गेला की ते विकारशून्य म्हणजेच निर्विकार बनतं. त्याचप्रमाणे ज्या दगडात टाकीचे घाव सोसण्याची क्षमता आहे त्यामधूनच सुंदर अशी मूर्ती तयार होते. अशा या टाकीचे घाव सोसलेल्या दगडामधून तयार झालेल्या मुर्तीला देवाचे अधिष्ठान प्राप्त होते. मग त्यालाच देव मानून सर्व लोक त्याची पूजा करतात आणि मनोभावे दर्शन घेतात.
 
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007