मुंबई,
Assembly Election : १५ व्या विधानसभेच्या २८८ मतदारसंघांच्या लागलेल्या निकालात काही उमेदवार एक हजाराहून कमी मतांनी विजयी झाले. अर्थात् या उमेदवारांचा निसटता विजय झाला आहे. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचाही समावेश आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे ३७७ मतांनी विजयी झाल्या. मंदा म्हात्रे यांना ९१,८५२ मते मंदा म्हात्रे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे संदीप नाईक यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला असून, संदीप नाईक यांना ९१,४७५ मते मिळाली आहेत.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड ८४१ मतांनी विजयी झाले. गायकवाड यांना ९१,६६० मते मिळाली. गायकवाड यांच्याविरोधात उबाठा गटाच्या जयश्री शेळके रिंगणात होत्या. शेळके यांना ९०,८१९ मिळाली. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे मौलाना मुफ्ती १६२ मतांनी विजयी झाले. मौलाना मुफ्ती यांना एकूण १,०९,६५३ मते मिळाली. त्यांच्याविरोधात आसिफ शेख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, त्यांना १,०९,४९१ मते मिळाली.
नाना पटोले थोडक्यात बचावले
Assembly Election : यावेळी सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, भाजपाचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस निवडणूक हरत असल्याचा दावा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः आपल्या साकोली मतदारसंघात थोडक्यात बचावल्याचे दिसले. नाना पटोले केवळ २०८ मतांनी विजयी झाले. पटोले यांना ९६, ७९५ मते मिळाली. त्यांच्याविरोधात अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती. त्यांना ९६,५८७ मते मिळाली. ब्राम्हणकरांनी पटोलेंना धोबीपछाड दिलीच होती; मात्र ते थोक्यात बचावले.