- राज्यपालांच्या भेटीत विरोधकांची मागणी
मुंबई,
राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, ही बाब महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणारी आहे. याची गंभीर दखल घेऊन, राज्यात Rastrapati Rajvat राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राकाँ गटातील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन केली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
दोन महिन्यापूर्वीही राज्यपालांना भेटून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अवगत केले होते, त्यानंतर राज्यपालांनी पोलिस महासंचालकांना बोलावून सुधारणा करण्याचा निर्देश दिला होता. परंतु, आता नवीन पोलिस महासंचालक आले आणि कायदा सुव्यवस्था आणखी ढासळली. जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचे खुद्द पोलिस महासंचालकांनीच मान्य केले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, पुण्यात पत्रकार निखील वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला करण्यात आला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्ये दोन लोकांवर गोळीबार केला. जळगावातील भाजपाचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली. या सर्व घटनांच्या पृष्ठभूमीवर राज्यात Rastrapati Rajvat राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केंद्र सरकारला करावी, अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.