गोंदिया,
action against electricity thieves : महावितरणचे जाळे गावोगावी पसरले आहे. असे असतानाही अनेक जण आकडे टाकून वीज चोरी करतात. त्यांच्याविरोधात महावितरण वेळोवेळी कारवाई करते. मागील एका वर्षात तब्बल 300 वीज चोरट्यांवर कारवाई करण्यात आली असून 20 जणांवर फौजदारी कारवाई केली. त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा दंडही वसुली करण्यात आला.
महावितरणकडून अधिकृत वीज मीटर घेऊन तसेच नियमीत वीज बिलाचा भरणा करुन वीजपुरवठा करण्याचे आवाहन करण्यात येते. त्यासंदर्भात जनजागृतीही केली जाते. मात्र थकीत वीज बिलापोटी वीजपुरवठा खंडीत करुन तसेच वीज मीटर काढल्यावरही थेट वीज चोरी, मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी करण्याचे प्रकार मागील काही वर्षात वाढले आहे. मात्र वीज चोरीची प्रकरणे कमी होत नसल्याने विशेष मोहिम राबवित वर्षभरात तब्बल 300 च्या वर प्रकरणात कलम 126 व 135 अंतर्गत कारवाई केली. तर 20 जणांविरोधात पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. मात्र वसुली व कारवाया होत असल्या तरी महावितरणचे कोट्यवधी रुपयांचा महसूल मात्र वीज चोरीतून बुडत असल्याची माहिती विभागाने दिली. ग्राहकांनी नियमीत व अधिकृत वीज जोडणी करुन तसेच वेळेवर वीज बील भरुन वीजेचा वापर करावा, अन्यथ कारवाईसाठी तयार राहावे, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले आहे.