तुका आकाशाएवढा
- प्रा. मधुकर वडोदे
संतांच्या नावावर अनेक प्रकारे आज फसविले जात आहे. अशा प्रकारामुळे विनाकारणच संत-माहात्मे बदनाम होताना दिसत आहेत. असणार्या श्रद्धेला ठेच पोहोचत आहे. माणसा-माणसांवरचा विश्वास तुटत आहे. यशाचे मूळ कारण म्हणजे दांभिकांची वाढलेली संख्या होय. म्हणूनच खरे संत कोणते व दांभिक वृत्तीचे कोणते हे आपणास ओळखता आलं पाहिजे. त्याकरिता Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी खरे संत ओळखण्यासंदर्भाची माहिती आपल्या अभंगाच्या माध्यमातून दिलेली आहे.
हेतू एकच मनी ठेवून की, संतांचं व त्यांच्या संगतीचं माहात्म्य समजावं. सामाजिक द़ृष्टिकोनातून संताचं कार्य किती मोठं आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराजांनी आयुष्यभर केला. संत तुकाराम महाराज हे समाजवादी व बंधुत्ववादी विचारसरणीचे होते. त्यांनी मानवतावादी विचारसरणीचा पुरस्कार केला. हे करत असताना दांभिकापासून दूर राहण्याकरिता संत ओळखण्याची खूण सांगताना तुकोबांनी आपल्या लेखणीच्या साहाय्याने अर्थात अभंगाच्या माध्यमातून सांगितलं; ते याप्रमाणे की,
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले॥
तो चि साधु ओळखावा। देव तेथे चि जाणावा॥
मृदू सबाह्य नवनीत। तैसे सज्जनाचे चित्त॥
ज्यासि आपंगिता नाही। त्यासि धरी जो हृदयी॥
दया करणे जे पुत्रासी। ते चि दासा आणि दासी॥
तुका म्हणे सांगू किती?। तो चि भगवंताची मूर्ती॥
अ. क्र. 204
जगात सर्वच सुखाच्या शोधात आहेत. सुख सर्वांना हवं असतं. असं असले तरी सुख प्रत्येकाच्या वाट्याला कसे येणार? दु:खामुळे सुखाची तर दुर्जनामुळे सज्जनाची किंमत आपणास समजलेली आहे. म्हणूनच सुख सर्वांना हवं असतं; दु:ख नव्हे. आयुष्याला छळणार्या दु:खातून सुटका करण्याकरिता कोणाचं मार्गदर्शन घ्यावं? वारंवार आपल्या हिस्स्यावर आलेलं संकट कसं दूर करता येईल? या प्रतीक्षेत सर्वसामान्य लोक असतात. या संधीचा फायदा दांभिक उचलताना दिसतात. अज्ञानापोटी हे घडत असतं. म्हणूनच की काय, अशा लोकांची अनेक वेळा फसवणूक होताना दिसते. परिणाम आहे त्यापेक्षा अधिक दु:ख पदरात पडताना दिसते. म्हणूनच अशा दांभिक वृत्तीच्या लोकांपासून लांब राहण्याकरिरता खरे संत कोणते ते समजणे गरजेचे आहे. कारण हेच संत आपणास सुखाचा मंत्र सांगू शकतात. तेच या दलदलीतून बाहेर काढू शकतात. एवढंच नव्हे, तर त्यांच्या उपदेशानं आपलं जीवन सत्कर्मी लागून समाजोपयोगी कार्य हातून घडू शकते. दु:खाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकतात. याकरिता दांभिक आणि संत यांचं वेगळेपण समजावं याकरिता Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी सर्वसामान्य लोकांना अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन केलं आहे.
समाजात अनेक दु:खी-कष्टी माणसं जागोजागी दिसतात. त्यांच्यावर आलेल्या संकटांशी दोन हात करता-करता थकून गेलेले दिसतात. मग अशा या अत्यंत हलाखीचं जीवन जगणार्याला कुणीही सोबत घ्यायला सहजासहजी तयार होत नाही. त्यांची कुचंबना होताना दिसते. रोज-रोज होणार्या अपमानित जीवनाला ते कंटाळून जातात. त्यांचं जीवन सुसह्य करण्याकरिता कुणीही पुढं येत नाही. अशाच वेळी माणसाला चांगल्या संगतीची गरज असते. चांगला सहवास, मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा पडझडीच्या काळात जर का आपलं दु:ख समजावून घेत असेल, आत्मीयता दाखवत असेल आणि हे सर्व तो नि:स्वार्थपणे कुणी जर करत असेल तर असं हे पवित्र कार्य माणसातीलच असलेला तो संत असतो, असे Tukaram Maharaj तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. देव दुसरा-तिसरा कोणी नसून तो माणसाच्या रूपात असतो. संकटाच्या वेळी आपल्या मदतीला धावून येतो तोच खरा संत. अशाच वेळी त्यांचं वेगळेपण जाणवत असतं.
खर्या संताची ओळखीची खूण सांगताना महाराज म्हणतात की, संतांचं मन हे आईच्या मनासारखं असतं. त्याच्या विषयी काठोकाठ ममत्व भरलेलं असतं. दु:खी-कष्टी माणसांना जवळ करून त्यांचं दु:ख निवारण्याचं काम प्रामाणिकपणे सातत्यानं करीत असून अनाथ, निराधारांचा सांभाळ संतच करू शकतात. आपलेपणानं जे काम करतात तेच खरे संत असल्याचं तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. रंजल्या गांजल्याची सेवा हेच अंतिम उद्दिष्ट असल्याने सामान्य माणसांच्या आयुष्यात ते चैतन्य निर्माण करू शकतात. म्हणूनच असे म्हटले गेले की, ‘साधु संत येती घरा तोचि दिवाळी दसरा...’ संतांनाच देवत्व बहाल केलं आहे. म्हणूनच खरे साधुसंतांची ही कसोटी लागलेली आहे. या व्यतिरिक्त जे स्वत:ला संत म्हणवून घेत असतील तर अशा दांभिकापासून आपण दूर राहावे. हा त्या मागचा खरा हेतू होता. सोंगा-ढोंगाचा माणूस ओळखता आले पाहिजे. केवळ तुळसीच्या माळा गळ्यात घातल्याने किंवा वार्या करण्याचा आव आणणार्यांना साधुत्व प्राप्त होत नाही. सामान्य माणसांना देवाच्या नावावर, संतांच्या नावावर फसविणारे दांभिक ओळखता आले पाहिजे. त्याकरिता खरा संत ओळखण्याच्या खुणा कोणत्या हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून निष्ठेने काम करणं हीसुद्धा एक प्रकारची पूजाच आहे. निराधारांना आधार देणं, तर अनाथांचा नाथ होणं सोपं काम नाही. याकरिता सात्त्विक अंत:करण लागतं आणि हे असं अंत:करण संतांचं असतं. असे चांगलं काम करणार्यास Tukaram Maharaj संत म्हणता येईल.
दु:खी-कष्टी माणसांचा दु:ख निवारण्यासाठी मृदू भाव ठेवून आपलेपणानं समोरच्याचं काय म्हणणं आहे हे शांतपणे जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा त्याला योग्य न्याय देता येऊ शकतो. कारण सज्जन माणसाचं मन हे आंतर्बाह्य लोण्यासारखे मऊ असते. त्याची भाषा, स्वभाव, वागणूक ही जनताजनार्दनाची मानून दु:ख निवारण्याचं मन असतं. समाजातील उपेक्षित, हीन-दीनांच्या भार तो स्वत:च्या खांद्यावर अलगदपणे उचलून घेतो. अशी सेवा फक्त संतच करू शकतात. माणुसकीची कणव हेच त्यांचे भांडवल असते. ही बाब ते आपल्या कार्यातून, आचरणातून सिद्ध करीत असतात. सर्व प्रकारची अज्ञाने, घालवून समरसतेची सर्वस्पर्शी प्रेरणा देण्याचं, एकसंध समाज निर्मितीचे काम संत करताना दिसतात.
संतश्रेष्ठ Tukaram Maharaj तुकाराम महाराजांनी अभंग लिहून कीर्तनाच्या माध्यमातून साध्या, सरळ, सोप्या भाषेत समजेल असे सांगून सामान्य जनतेला सावध केलं. खरे काय आहे हे समजावून सांगितले. समाजातील उच्च-नीचता, गरीब-श्रीमंत, जाती-जातीतील विरोधाच्या भिंती टिकू दिल्या नाही. मानवतावादी विचारसरणीचा आयुष्यभर पुरस्कार केला. समता व बंधुत्ववादी विचाराचा अनेक प्रकारच्या विरोधाशी सामना करीत निर्भीडपणे आपले विचार व्यक्त केले. याच वाटेवर आयुष्यभर आपली वाटचाल अखंडपणे चालू ठेवली. असं हे आत्मानुभूतीच्या सामर्थ्याने झळाळणारं व्यक्तिमत्त्व होतं. सर्व प्रकारच्या उपेक्षा, तिरस्कार आणि काही प्रमाणात असणारा सामाजिक छळ न जूमानता आत्मनिष्ठ झालेलं व्यक्तिमत्त्व म्हणून रंजल्या गांजल्यांना हृदयाशी उचलून घेऊन त्याचे नीट, प्रामाणिक, नि:स्वार्थ वृत्तीने संगोपन करणारा संत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते तसेच आपण आपल्या मुलांशी जसे वागतो तीच भावना शेजार्याच्या मुलांकरिता असावी. तेव्हा कुठे मनातला दुजाभाव नाहीसा होईल. मनामनात बंधुभाव असावा. त्याच्या अडचणी जाणून घ्याव्या. तो त्या अडचणीमधून कसा बाहेर पडेल या संदर्भात त्याला मदत करावी व मनामनात बंधुभाव असावा. ही शिकवण संत तुकाराम महाराजांनी प्रत्यक्षात आचरणात आणली. त्यांच्या हिस्स्यावर आलेल्या कर्जधारकांची असलेली नामावली फाडून फेकून दिली. खर्या अर्थाने शेतकर्यांना कर्ज मुक्त केले. कर्जमुक्तीचा संदेश केवळ न देता सुरुवात आपल्यापासून करणारे ठरले. खर्या अर्थाने त्यांनी रंजल्या-गांजल्यांची मनोभावे सेवा केली. म्हणूनच तुकोबा समाजाच्या द़ृष्टीने संत ठरले. जनसामान्यांसाठी दिवस-रात्र झटले. आपल्या विचारातून देव माणसातच असल्याचे त्यांनी सिद्ध केले.
- 9422200007