26,600 ग्राम रोजगार सेवकांचा गटविमा काढा: मुख्यमंत्र्यांचा आदेश

पदनामात बदल करून मानधन वाढविण्याचीही तयारी

    दिनांक :02-Feb-2024
Total Views |
मुंबई, 
Gram Rozgar Sevak : ग्राम पंचायत स्तरावर काम करणार्‍या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचा निर्देश मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
 
 
CM GRAM ROJGAR
 
 
 
ग्राम रोजगार सेवकांच्या पदनामात बदल करून ते ग्रामरोजगार सहायक करण्यात येईल, असे जाहीर करतानाच मानधनात वाढ करण्यासाठी इतर राज्यांनी यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयांची माहिती घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
 
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेख आणि नोंदवह्या आदी कामांसाठी ग्रामसेवकांना मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा घेण्यात आल्या आहेत. राज्यात 26 हजार 600 ग्राम रोजगार सेवक ग्राम पंचायत स्तरावर कार्यरत असून, त्यांना कामाच्या प्रमाणानुसार मानधन दिले जाते. ग्राम रोजगार सेवकांना सध्या विमा कवच नसल्याने अपघात किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांचे हाल होतात, ही बाब लक्षात आल्यावर ग्राम रोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिला. कोरोना काळात मृत्यू झालेल्या ग्रामरोजगार सेवकांची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
 
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोजगार हमी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, ग्राममविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, रोहयो मिशन महासंचालक नंदकुमार यांच्यासह ग्राम रोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.